शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

झायगार्निक प्रभाव | Zeigarnik effect

 

झायगार्निक प्रभाव | Zeigarnik effect

अपूर्ण कामांबद्दलच्या विचारांमुळे तुम्हाला कधी त्याचा त्रास झाला आहे का? कदाचित पूर्ण न झालेल्या कामाच्या प्रकल्पाबद्दल किंवा अर्धवट वाचलेल्या कादंबरीच्या कथानकाबद्दलचे विचारचक्र आपणास झोपू देत नाहीत. अपूर्ण आणि अडथळा असलेल्या कार्यांबद्दलचे विचारचक्र थांबवणे इतके कठीण का आहे तर याचे एक कारण आहे. मानसशास्त्रज्ञ याला झायगार्निक प्रभाव म्हणतात, किंवा पूर्ण केलेल्या कामांपेक्षा अपूर्ण कार्ये अधिक लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती असे म्हणतात. म्हणून तर आपण हजार कामे व्यवस्थित केलेली असतील आणि एखादे काम केलेले नसेल तर त्याच्यावरच सगळ्यांचे लक्ष जाते.

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम सुरू करतो पण ते पूर्ण करत नाही, तेव्हा आपण इतर गोष्टींकडे वळलो तरीही अपूर्ण कामासंबंधीचे विचार आपल्या मनात येत राहतात. असे विचार आपणास मागे जाण्याची आणि आपण अगोदर सुरू केलेली गोष्ट पूर्ण करण्यास उद्युक्त करतात. म्हणूनच अनेक रोमांचक व उत्सुकता वाढविणाऱ्या कांदबऱ्या अधिक का वाचल्या जातात? किंवा रोमांचक व उत्सुकता वाढविणारे चित्रपट का अधिक बघितले जातात?. तसेच आपणास जिंकेपर्यंत व्हिडिओ गेम का खेळावेसे वाटते. कारण आपण इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरीही अपूर्ण कामाचा प्रभाव पडत राहतो.

साधारण २०१६ मध्ये बाहुबली हा चित्रपट आला आणि सगळ्यांच्या डोक्यात एक विचार घोळत राहिला तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे खरे उत्तर बाहुबली 2 ची कथा समोर आल्यावरच कळली. तसेच डेलीसोप आणि टीव्ही मालिका या प्रभावाचा फायदा घेतात. कारण एपिसोड संपेल, पण कथा अपूर्ण असते. अलिकडे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम सारख्या ओटीटी प्लटफर्मवर दर्शकांना खिळवून ठेवतात आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ते पुढील वेळी ट्यून करणे लक्षात ठेवतील यासाठी झायगार्निक प्रभाव काम करतो.

झायगार्निक प्रभावाची सुरुवात

मानसशास्त्रामध्ये असा एक मानसिक प्रभाव आहे त्यास त्याच्या शोधकर्त्याच्या नावावरून ओळखले जाते. या सिद्धांताची सुरुवात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, सोव्हिएत मानसशास्त्रज्ञ ब्लूमा झायगार्निक आणि तिचे मार्गदर्शक कर्ट लेविन यांच्याबरोबर व्हिएन्नामधील एका व्यस्त रेस्टॉरंटमध्ये बसले असताना लेविनने तिचे लक्ष एका विचित्र नियमिततेकडे वेधले. वेटरने नोट्सचा अवलंब न करता ऑर्डरचे सर्व तपशील उत्तम प्रकारे लक्षात ठेवले. पण ते पूर्ण केल्यावर, आधीच्या पाहुण्यांनी नेमके काय ऑर्डर दिली हिती ते त्याला आठवत नव्हते.

तिने नोंदवले की वेटर्सना न चुकता ऑर्डर चांगल्याप्रकारे आठवत होत्या. एकदा बिल भरल्यानंतर मात्र, वेटरना ऑर्डर्सची नेमकी माहिती लक्षात ठेवण्यात अडचण आली. वेटरशी बोलल्यानंतर, त्यांना असे कळले की त्यास सर्व ऑर्डर आठवणीत होत्या, परंतु त्याने नुकतीच कोणती कामे पूर्ण केली आहेत हे आठवत नव्हते. यावरून एखादी व्यक्ती स्वत:साठी त्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्ण आणि अपूर्ण कामे लक्षात ठेवते असे मत झायगार्निक यांनी मांडले. आपल्या प्रबंधात स्मरणशक्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य प्रस्थापित केले आणि त्याचे वर्णन केले: आपण पूर्ण केलेल्या क्रियांपेक्षा अपूर्ण क्रिया अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो.

झायगार्निक प्रयोग

प्रयोगांच्या अनेक मालिका तिने घेतल्या, त्यामध्ये सहभागींना स्ट्रिंगवर मणी ठेवणे, कोडी सोडविणे किंवा गणिताच्या समस्या सोडवणे यासारखी सोपी 15 ते 20 कार्ये पूर्ण करण्यास सांगितले गेले. एक तासाच्या विलंबानंतर, झायगार्निकने सहभागींना ते कशावर काम करत होते याचे वर्णन करण्यास सांगितले. तिला असे दिसून आले की ज्यांच्या कामात व्यत्यय आणला होता त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता ज्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केली होती त्यापेक्षा दुप्पट होती.

प्रयोगाच्या दुसर्‍या आवृत्तीत, तिला आढळले की प्रौढ सहभागी पूर्ण झालेल्या कामांपेक्षा 90 टक्के जास्त वेळा अपूर्ण कार्ये लक्षात ठेवण्यास सक्षम होते. "On Finished and Unfinished Tasks" असे शीर्षक असलेल्या पेपरमध्ये झायगार्निकच्या सुरुवातीच्या अभ्यासाचे वर्णन 1927 मध्ये प्रकाशित झालेले आहे. प्रयोगांमध्ये प्रयुक्तांना अनेक बौद्धिक समस्या सोडवाव्या लागतात. समस्येचे निराकरण यादृच्छिकपणे करण्यासाठी निश्चित वेळ सेट न करता वेळ कालबाह्य झाली आहे असे कोणत्याही वेळी ती घोषित करत असे जेणेकरून समस्या अपूर्ण राहतील. काही दिवसांनंतर, प्रयुक्तांना देण्यात आलेल्या कार्यांची यादी करण्यास सांगितले असता, असे आढळून आले की समस्येच्या निराकरणात व्यत्यय आणल्यास त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या कार्यापेक्षा दुप्पट होती, या वैशिष्ट्यास झायगार्निक प्रभाव म्हणतात. झायगार्निकला असेही आढळले की एखाद्या कार्याची सुरूवात स्मृतीत एक व्होल्टेज तयार करते, जे कार्य पूर्ण होईपर्यंत डिस्चार्ज होत नाही. ते पूर्ण होण्यासाठी, कार्य साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. जर कार्य सेट केले गेले आणि पूर्ण झाले नाही, तर आपला मेंदू आपल्याला याची आठवण करून देत राहतो आणि आपण त्या विचारांसह अनैच्छिकपणे त्याकडे परत जातो. हा प्रभाव आपल्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर दिसून येतो. बहुदा, प्रत्येक व्यक्तीस त्याची कार्ये पार पाडायची असतात आणि पूर्णतेचा अनुभव घ्यायचं असतो.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने झायगार्निक प्रभाव

तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर परीक्षेच्या आदल्या रात्रभर अभ्यास करण्यापेक्षा तुमचे अभ्यासाचे सत्र खंडित स्वरूपाचे असावे. सलग अभ्यास न करता ठराविक अंतराने विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमाने अभ्यास केल्यास लक्षात राहण्यास मदत होते. त्यामुळे अधिक विषयांचा अभ्यास करून, तुम्हाला चाचणीच्या दिवसापर्यंत लक्षात राहण्याची शक्यता जास्त असेल.

जर तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अवघड जात असेल, तर क्षणिक व्यत्यय तुमच्या फायद्यासाठी कार्य करू शकतो. माहितीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करण्याऐवजी, त्याचे काही वेळा पुनरावलोकन करा आणि नंतर विश्रांती घ्या. तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असताना, तुम्ही अभ्यास करत असलेल्या माहितीकडे मानसिकदृष्ट्या परत येत असता.

दिरंगाईवर मात करण्यासाठी

बर्‍याचदा, आपण अंतिम क्षण येत नाही तोपर्यंत काम हाती घेत नाही, अंतिम मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी केवळ धावपळीत पूर्ण करतो. दुर्दैवाने, या प्रवृत्तीमुळे केवळ मोठ्या प्रमाणावर ताणच येतो असे नाही, तर यामुळे कामगिरीदेखील खराब होऊ शकते.

दिरंगाईवर मात करण्याचा एक मार्ग म्हणून झायगार्निक प्रभाव कार्य करतो. कोणतेही काम कितीही लहान असले तरीही पहिले पाऊल उचलून सुरुवात करा. एकदा तुम्ही तुमचे काम सुरू केल्यावर—परंतु पूर्ण झाले नाही—तर, शेवटी, तुम्ही ते पूर्ण करेपर्यंत स्वतः त्या कार्याचा विचार कराल. आपण हे सर्व एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही, परंतु आपण उचललेले प्रत्येक लहान पाऊल आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाच्या जवळ घेऊन जाते.

हा दृष्टीकोन केवळ तुम्हाला कार्य पूर्ण करण्यास प्रवृत्त करत नाही, तर एखादे काम पूर्ण केल्यानंतर आणि आपली मानसिक शक्ती इतरत्र लागू करण्यास सक्षम झाल्यावर काहीतरी प्राप्त केल्याची भावना देखील निर्माण करू शकते.

आवड आणि लक्ष वेधून घेणे

ग्राहकांना उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जाहिरातदार आणि विक्रेता देखील झायगार्निक प्रभावचा वापर करतात. चित्रपट निर्माते, गंभीर तपशील सोडून लक्ष वेधण्यासाठी डिझाइन केलेले चित्रपटाचे ट्रेलर तयार करतात. ते दर्शकांचे लक्ष वेधून घेतात आणि  लोकांच्यामध्ये उत्सुकता वाढवतात. यांचे एक छान उदाहरण पाहू या...

व्ही शांताराम यांनी त्याकाळी पिंजरा चित्रपटाचे प्रमोशन हटके अंदाजात केलेले पाहायला मिळाले होते. वेळेची कमतरता आणि अपुरा पैसा ह्यामुळे चित्रपटाच्या जाहिराती करणे देखील कठीण होत होते. अश्यातच नवी युक्ती सुचली आणि इतिहास घडला. पुण्यातील रिक्षांवर कुठलाही फोटो न छापता केवळ ‘पिंजरा’ लिहूनच प्रमोशन केले होते. त्यामुळे हा पिंजरा नक्की आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला होता. अखेर ३१ मार्च १९७२ चा तो दिवस उजाडला आणि प्रेक्षकांनी पिंजरा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहाबाहेर तुडुंब गर्दी केलेली पाहायला मिळाली.

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम देखील या धोरणाचा वापर करतात. मालिकांचा भाग बर्‍याचदा उत्कंठा वाढवून संपवतात किंवा पुढील भागात नेमके काय होणार हे दाखविण्याचा प्रयत्न केलें जातो जेणेकरून उत्सुकता निर्माण करतात. असा सस्पेन्स आणि तणाव वाढवून तसेच काय होते हे जाणून घेण्यासाठी दर्शकांना पुढील भागासाठी ट्यून इन करण्यास प्रवृत्त केले जाते.

समारोप

झागार्निक प्रभाव सांगते की पूर्ण झालेल्या कामांपेक्षा अपूर्ण कामे लोकांच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. या सिद्धांताचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यत्यय आलेले काम, अपूर्ण प्रकल्प आपले लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देण्याची त्यांची प्रवृत्ती असते. सतत उद्दिष्ट निश्चित केल्यामुळे आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या विचारांमुळे नकारात्मक परिणाम, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. तथापि, हे सिद्धी आणि सुधारित स्व-मूल्याची उत्तम भावना देखील देऊ शकते. एकूणच, झागार्निक परिणाम आपल्या वैयक्तिक मानसिक आरोग्यावर अवलंबून असतो. कोणतेही काम पूर्णत्त्वास नेत असताना थोडासा ताण अपेक्षित आहे पण त्याचे फलित उत्तमच असेल. तसे पाहिल्यास जीवनाचा प्रवास हा अपूर्णच असतो तो कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे अपूर्णतेकडून पूर्णत्त्वाकडे जाणारा हा प्रवास आनंदमयी होवो हीच प्रार्थना!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ

Nickerson, C. (2021). What Is the Zeigarnik Effect? Definition and Examples. Simply Psychology. retrieved from www.simplypsychology.org/zeigarnik-effect.html

Mazur, Elena (1996). The Zeigarnik Effect and the Concept of Unfinished Business in Gestalt Therapy, British Gestalt Journal, Vol.5/1, pp.18-23.

Savitsky, K., Medvec, V. H. and Gilovich, T., (1997) Remembering and Regretting: The Zeigarnik Effect and the Cognitive Availability of Regrettable Actions and Inactions, Personality and Social Psychology Bulletin, Vol.23/3, pp.248-257

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

 

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

ए‍कविसावे शतक हे तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे शतक आहे आणि येथे सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असून सहकार्याने काम करणे अपेक्षित आहे. ए‍कविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल.

प्रत्येकास यशस्वी होण्यासाठी ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच अनेक शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. ए‍कविसाव्या शतकात घडणार्‍या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षण पद्धती किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का हा कदाचित वादाचा मुद्दा असेलही पण आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शाळेतून शिकवली जातात का? हा विचार प्रवृत्त करणारा प्रश्न आहे. अशा कौशल्यांच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच ‘SKILLS FOR 21ST CENTURY‘.

आपणास एकाविशाव्या शतकातील कौशल्यांची गरज का आहे?

शिकणे तेव्हाच पूर्ण आणि सर्वांगीण होते जेव्हा एखादा विद्यार्थी स्वत:, शाळा, कुटुंब, समाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाप्रती असलेल्या त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम असतो. आजच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता ओळख आणि क्षमतांची चांगली जाणीव असणे तसेच एक चांगला नागरिक आणि एक जबाबदार माणूस बनण्यासाठी सक्षम करणे हे एकाविशाव्या शतकातील कौशल्यांचे ध्येय आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या आणि समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम बनविते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेले आढळते. अध्ययन कौशल्ये (Learning Skills): नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये. साक्षरता कौशल्ये (Literacy Skills): वाचन, माध्यम आणि डिजिटल संसाधनांद्वारे नवीन ज्ञान तयार करण्यात आणि प्राप्त करण्यात मदत करणारी कौशल्ये. जीवन कौशल्ये (Life Skills): दैनंदिन जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये.

अध्ययन कौशल्ये (शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी)

अध्ययन कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर कामाचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये. अध्ययन कौशल्ये ही खालील चार प्रकारात विभागलेली आहेत.

1. चिकित्सक विचार करणे (Critical Thinking)

चिकित्सक विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे होय. चिकित्सक विचारामध्ये प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील राहणे, प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असणे, स्वतंत्र वैचारिक बैठक असणे, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य असणे आणि मूल्ये, समवयस्कांचा दबाव आणि मीडियांचा प्रभाव ओळखणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

2. संप्रेषण (Communication)

संप्रेषण म्हणजे एखाद्याची मते, इच्छा, गरजा, शंका इत्यादी योग्यरित्या, शा‍ब्दिक  आणि अशाब्दिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता होय. आज संप्रेषणाची माध्यमे बदलली असली तरीही आभासी संप्रेषण करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणे ही कौशल्ये प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक आहेत.

3. सर्जनशीलता आणि नवोपक्रमशीलता (Creativity and Innovation)

विचार करण्याचे नवीन मार्ग शोधणे आणि तयार करणे यांचा समावेश सर्जनशील कौशल्यात होतो. सर्जनशीलता म्हणजे गोष्टीकडे पाहण्याचा किंवा गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचा नवीन मार्ग शोधणे होय यामध्ये प्रवाहीपणा (नवीन कल्पना निर्माण करणे), लवचिकता (दृष्टीकोन सहज बदलणे), मौलिकता (मूलभूत कल्पनांचा आविष्कार), आणि विस्तार (इतरांच्या कल्पनांवर आधारित) यांचा समावेश होतो.

नाविन्यपूर्ण कौशल्ये म्हणजे काहीतरी नवीन/अद्वितीय/सुधारित/विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यासाठी सर्जनशीलपणे विचार करण्याची कौशल्ये. नवनवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूंनी विचार करताना कोणत्याही विचाराशी चिकटून न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहजपणे विस्तार करता येणे इत्यादी कौशल्ये सर्जनशीलतेत येतात.

4. सहकार्य (Collaboration)

सहकार्य म्हणजे इतरांसोबत प्रभावीपणे काम करण्याची क्षमता तसेच इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता होय. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असतात त्यावेळी इतरांच्या मतांचा आदर ठेऊन, संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणे आवश्यक ठरते. सहकार्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रस आणि मनोरंजन विकसित होण्यास मदत होते. हे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय सीमा प्रभावीपणे विस्तृत करते आणि विद्यार्थ्यास सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.

साक्षरता कौशल्ये (माहिती-तंत्रज्ञान युगात यशस्वी होण्यासाठी)

साक्षरता या विभागात माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता यांचा समावेश होतो. या कौशल्यांमध्ये माहिती (पारंपारिक किंवा डिजिटल), माध्यम आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची क्षमता, सामग्री आणि माहितीचे विविध पैलू समजून घेणे, गंभीरपणे मूल्यांकन करणे, प्रभावीपणे तयार करणे आणि संप्रेषण करणे समाविष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने माहिती असलेली साक्षरता महत्वाची आहेच पण त्याच बरोबरीने एकविसाव्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहेत. या साक्षरतेचे तीन  प्रकारात विभागणी केलेली आहे.

1. माहिती साक्षरता (Information Literacy)

सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे (उदाहरणार्थ– इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास/विश्लेषण करणे), माहितीचा योग्य आणि सर्जनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी.

2. माध्यम साक्षरता (Media Literacy)

एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणे, एखाद्या मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणे, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूंची माहिती असणे इत्यादीचा समावेश यात होतो.

3. तंत्रज्ञान साक्षरता (Technology Literacy)

तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.

जीवन कौशल्ये (जीवनात यशस्वी होण्यासाठी)

नावाप्रमाणेच जीवन कौशल्ये म्हणजे वैयक्तिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये होत. बहुतांशी ही कौशल्ये वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात देखील होतो.

1. लवचिकता आणि अनुकूलता (Flexibility and Adaptability)

लवचिकता आणि अनुकूलता म्हणजे सतत आपल्या सभोवताल होणार्‍या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे आणि नवीन परिस्थितीनुसार त्याने उचललेली पावले आणि नैतिकता आणि मूल्यांशी तडजोड न करता कार्यक्षमतेने अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करणे होय.

नवीन वातावरणाला अनुकूल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणे म्हणजे  अनुकूलता होय. विद्यार्थ्यांसाठी, हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी लवचिक आणि अनुकूल होण्यासाठी आवश्यक कौशल्ये समजू शकतात आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य उपाय शोधू शकतात.

2. नेतृत्व आणि जबाबदारी (Leadership and Responsibility)

नेतृत्व म्हणजे संघाचे नेतृत्व करणे तसेच वेगवेगळ्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आणि वास्तविक जगाच्या आव्हानांच्या संदर्भात प्रभावी संघ व्यवस्थापन करण्यास सक्षम असणे होय. या कौशल्यामुळे मुलाला चिकाटी, वचनबद्धता आणि जबाबदार असणे, लवचिकता आणि आत्मविश्वास यासारख्या मुख्य वैयक्तिक गुणांच्या विकासास कसे समर्थन द्यावे आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वचनबद्धता कशी वाढवावी हे शिकविते.

जबाबदार असणे म्हणजे एक चांगला आणि प्रभावी/संवेदनशील नागरिक असणे. एक माणूस म्हणून आणि विद्यार्थी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता, भविष्यात परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता. माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून, आपली मूलभूत कर्तव्ये आणि हक्कांची जाणीव असणे आणि भारतातील मूलभूत लोकशाही मूल्ये अंतर्भूत करणे आणि त्यांच्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

3. पुढाकार घेणे आणि स्व-दिशा (Initiative and self-direction)

पुढाकार कौशल्यामध्ये स्वतंत्रपणे कार्य सुरू करण्याची क्षमता समाविष्ट असते यामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य आणि अंतःप्रेरणेतून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरु करण्याचे कौशल्य समाविष्ट आहेत. हे मुलाला स्वतःच्या विकासाचा मार्ग तयार करण्यास मदत करते. स्व-प्रेरणा आणि पुढाकार घेण्यावर प्रामाणिकपणे कार्य करणे हे स्व-दिशा कौशल्य आहे.

4. उत्पादकता आणि उत्तरदायित्व (Productivity and accountability)

ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले उत्पादक काम करता येणे तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य होय. विद्यार्थ्यामध्ये उत्पादकता विकसित करणे म्हणजे एका ठराविक कालावधीत कोणतेही कार्य पूर्ण करण्यास सक्षम बनविणे.

उत्तरदायित्व म्हणजे कोणत्याही कामासाठी जबाबदारीची भावना लक्षात येणे. विद्यार्थ्यामध्ये ही कौशल्ये विकसित केल्याने त्याला/तिला प्रभावीपणे काम करण्यास मदत होते आणि त्याच्या/तिच्या कृतींसाठी जबाबदार राहून तो/ती इतर समवयस्कांसाठी विश्वासार्ह बनवतो.

5. सामाजिक आणि आंतर-सांस्कृतिक संवाद (Social and cross cultural interaction)

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात संवाद साधण्याची, सहकार्याने आणि प्रभावीपणे काम करण्याची ही कौशल्ये आहेत. वेगवेगळ्या शहरांत, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतींमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी ठरतात.

समारोप:

सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ही कौशल्ये आत्मसात करता येतातच असे नाही त्यामुळे इतर ठिकाणाहून ही कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या येऊ घातलेले आणि आंमलात येत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) आपणास एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी अशा कौशल्यांची आवश्यकता अधोरेखित केलेले आढळते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात वयोगटानुसार आणि कौशल्यानुसार परिणाम कसा असावा हे उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ही कौशल्ये जर असतील तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यापासून आपणास कोणी थांबू शकणार नाही.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार )

संदर्भ:

CBSE (2020). 21st Century Skills: A Handbook, Delhi: Central Board of Secondary Education

Trilling, Bernie and Charles Fadel (2012). 21st Century Skills: Learning for Life in Our Times, New York: Jossey-Bass

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

मानसिक आरोग्य आणि आपण | Mental health

 

मानसिक आरोग्य आणि आपण | Mental health

प्रत्येकवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरुकता पसरविणे आणि मानसिक आरोग्याच्या समर्थनार्थ प्रयत्नांना बळकटी देणे हा आहे. मानसिक आरोग्य समस्यांवर काम करणार्‍या सर्व भागधारकांना त्यांच्या कार्याबद्दल आणि जगभरातील लोकांसाठी मानसिक आरोग्य सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी काय करू शकतो याबद्दल बोलण्याची संधी हा दिवस प्रदान करतो. 2022 या वर्षीची थीम सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि जीवन-कल्याण यास जागतिक प्राधान्य बनविणे (Make mental health & well-being for all a global priority) ही आहे.

भारतातील मानसिक आरोग्याची स्थिती

कोविड-19 महामारी साथीच्या प्रारंभापासून, अनेक संशोधनामधून विविध वयोगटातील व्यक्तींचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे सूचित केले आहे.  2017 मध्ये भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी “भारत संभाव्य मानसिक आरोग्य साथीचा सामना करत आहे” असे प्रतिपादन केले होते. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की त्याच वर्षी भारताची 14% लोकसंख्या मानसिक आरोग्याच्या आजारांनी ग्रस्त होती, ज्यात 45.7 दशलक्ष लोक अवसाद (depression) विकारांनी ग्रस्त होते आणि 49 दशलक्ष चिंता विकारांनी ग्रस्त होते. कोविड -19 महामारी साथीच्या आजाराने या मानसिक आरोग्याच्या संकटाला आणखी बळकटी दिलेली आहे, जगभरातील संशोधने असे सूचित करतात की व्हायरस आणि संबंधित लॉकडाऊनचा एकूण लोकसंख्येवर विशेषतः तरुण व प्रौढावर लक्षणीय परिणाम झालेला आहे.

इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह संघटनेच्या 2017 मधील अभ्यासात असे दिसून आले आहे की मानसिक विकारांमुळे भारतातील रोगाचा भार 1990 मध्ये 2.5% वरून 2017 मध्ये 4.7% पर्यंत वाढला. अवसाद आणि चिंता विकार, तसेच खाण्याच्या विकारांचे प्रमाण महिलांमध्ये लक्षणीय प्रमाणात अधिक असल्याचे दिसून आले. अवसाद आणि आत्महत्येमुळे मृत्यू यांच्यातील संबंध देखील महिलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले.

भारतात मानसिक आरोग्यविषयक विकार असणे हे सामाजिक मागासलेपण समजले जाते आणि मानसिक आरोग्य समस्या असणाऱ्यांशी संबंधित कलंक आहे असे मानले जाते (द लाईव्ह लव्ह लाफ फाउंडेशन, 2018). आजही अनेक ठिकाणी मानसिक विकार हे स्वयं-शिस्त आणि इच्छाशक्तीच्या अभावाचे परिणाम मानले जातात. मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक याबाबत उपचारांची उपलब्धता, खर्चिकता आणि जागरूकतेचा अभाव यामुळे उपचारांमध्ये लक्षणीय अंतर निर्माण झालेले पाहायला मिळते. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS), 2018-19 मध्ये असे आढळून आले की मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांपैकी जवळजवळ 80% लोकांना वर्षभरापासून उपचार मिळाले नाहीत. या सर्वेक्षणाने विविध मानसिक विकारांमध्ये (मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्था (NIMHANS), 2016) 28% ते 83% पर्यंतच्या मानसिक आरोग्य सेवा उपचारांमध्ये मोठे अंतर असल्याचे नमूद केलेले आहे.

कायदे आणि मानसिक आरोग्य सक्षमता

मानसिक आरोग्य सेवा कायदा (2017) भारतातील मानसिक आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी अनेक तरतुदी करते. हा कायदा मानसिक आरोग्य सेवा कायदा, 1987 रद्द करतो ज्यावर मानसिक आजार असलेल्यांचे अधिकार आणि एजन्सी ओळखण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली गेली (मिश्रा आणि गल्होत्रा 2018). यामध्ये 'आरोग्य' म्हणून मानसिक आरोग्यसेवेचा अंतर्भाव केलेला आहे; आणि केंद्रीय आणि राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण (SMHA) ची स्थापना करणे, जे मानसिक आरोग्य व्यवसायींची नोंदणी आणि सेवा-वितरण निकष लागू करण्याबरोबर भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देईल. कायदा मंजूर झाल्याच्या नऊ महिन्यांत राज्यांना SMHA स्थापन करणे आवश्यक असले तरी 2019 पर्यंत 28 पैकी फक्त 19 राज्यांनी SMHAची स्थापना केलेली आहे.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP)  हे 1982 मध्ये, WHO च्या शिफारशी लक्षात घेऊन, सामान्य आरोग्य सेवा प्रणालीचा एक भाग म्हणून मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सादर करण्यात आले. जरी हा कार्यक्रम सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यात यशस्वी झाला असला तरी, संसाधन मर्यादा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांनी त्याचा प्रभाव मर्यादित झाला होता (गुप्ता आणि सागर 2018).

विकसित देश मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या बजेटच्या 5-18% वाटप करतात, तर भारत अंदाजे 0.05% वाटप करतो (आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था, 2014). 2018 आणि 2019 मध्ये, वार्षिक अर्थसंकल्पात राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेवरील खर्चाचाही समावेश होता. मानसिक आरोग्य क्षेत्रात मानव संसाधन आणि संशोधनाच्या दृष्टीने क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये संस्थेला मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त, सरकार दरवर्षी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत लोकप्रिया गोपीनाथ बोर्डोलोई प्रादेशिक मानसिक आरोग्य संस्था (तेजपूर) आणि निमहांस (NIMHANS) यांना निधी वाटप करते. जरी निमहांस आवश्यक असलेल्या सर्वांना परवडणारी आणि सुलभ मानसिक आरोग्य सेवा देण्याचे वचन देत असले, तरी हे प्रयत्न अपुरे आहेत कारण निमहांस एकाच शहरात (बेंगळुरू) कार्यरत आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

मानसिक आरोग्य ही मानसिक कल्याणाची स्थिती असून ती लोकांना जीवनातील ताण-तणावांचा सामना करण्यास, त्यांच्या क्षमता ओळखण्यास, चांगले शिकण्यास आणि चांगले काम करण्यास आणि त्यांच्या समुदायासाठी योगदान देण्यास सक्षम बनविते. निर्णय घेण्यासाठी, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि आपण राहत असलेल्या जगाला आकार देण्याच्या आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतेला आधार देण्यासाठी मानसिक आरोग्य आणि जीवन-कल्याण हे अविभाज्य घटक आहेत. मानसिक आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि तो वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानसिकदृष्ट्‍या आरोग्यपूर्ण व्यक्तीची लक्षणे खालीलप्रमाणे (WHO).

मानसिकदृष्ट्‍या आरोग्यपूर्ण व्यक्ती

  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीमध्ये समायोजन करण्याची क्षमता असते.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीला वैयक्तिक मूल्याची जाणीव असते, ती योग्य आणि महत्त्वाची वाटते.
  • एक मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती त्याच्या समस्या शक्यतो स्वतःच्या प्रयत्नांनी सोडवते आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेते.
  • अशी व्यक्ती एकटी असताना आणि समूहात असताना भावनिकदृष्ट्या सुरक्षित असते, इतर लोकांच्या समस्या आणि हेतू समजून घेते.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीला जबाबदारीची जाणीव असते.
  • अशी व्यक्ती प्रेम देऊ शकतो आणि स्वीकारू शकतो.
  • अशा व्यक्ती कल्पनेपेक्षा वास्तव जगात राहत असतात.
  • अशा व्यक्ती आपल्या वर्तनातून भावनिक परिपक्वता दाखवतात आणि त्यांच्या दैनंदिन कामात निराशा आणि अपेक्षाभंग सहन करण्याची क्षमता विकसित करतात.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीस विविध प्रकारच्या आवड-निवडी असतात आणि सामान्यत: काम, विश्रांती आणि मनोरंजनाचे संतुलित जीवन जगत असतात.

निरोगी व्यक्ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी असते. याचा अर्थ मानसिक आरोग्याशिवाय शारीरिक आरोग्य असूच शकत नाही. आरोग्याची आधुनिक संकल्पना ही शरीराच्या योग्य क्रियाशीलतेवर अवलंबून आहे. यात एक निकोप, कार्यक्षम मन आणि नियंत्रित भावनांचा समावेश आहे. शरीर आणि मन दोन्ही कार्यक्षमतेने आणि एकजुटीने काम करत आहेत असा त्याचा अर्थ होतो. आपण सर्वजन मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास सक्षम बनू या.

समारोप:

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावं लागत आहे. स्टिग्मा, डिमेंशिया, हिस्टीरिया, चिंता, आत्महीनता यांसारख्या आजारांचा त्यामुळे सामना करावा लागत आहे. मानसिक आजारावर किंवा समस्यांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरु शकतो. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये मानसिक आरोग्याची जनजागृती करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ या. तसेच मित्रपरिवार, नातलग आणि सामाजिक संस्था यांना सामावून घेऊन सर्वांचे मानसिक आरोग्य निरोगी राहील यासाठी प्रयत्न करू या. आपणास मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


(सर्व छत्रे, इमेजेस Google वरून साभार)

संदर्भ:

Gupta, Snehil and Rajesh Sagar (2018), “National Mental Health Programme-Optimism and Caution: A Narrative Review”, Indian Journal of Psychological Medicine, 40 (6): 509-516. Available here.

India State-Level Disease Burden Initiative Mental Disorders Collaborators (2020), “The burden of mental disorders across the states of India: the Global Burden of Disease Study 1990–2017”, The Lancet Psychiatry, 7(2): 148-161. 

International Labour Organization (2020), ‘Youth and Covid-19: Impact on jobs, education, rights, and mental well-being’, Survey Report. 

Mishra, A. and Galhotra, Abhiruchi (2018), “Mental Healthcare Act 2017: Need to Wait and Watch”, International Journal of Applied and Basic Medical Research, Vol. 8/2 pp. 67-70.

National Institute of Mental Health and Neuro Sciences (2016), ‘National Mental Health Survey of India, 2015-16: Summary’, Survey Report.

Singh, O.P. (2018). District Mental Health Program - Need to look into strategies in the era of Mental Health Care Act, 2017 and moving beyond Bellary Model, Indian Journal of Psychiatry, Vol. 60/2 pp. 163-164. 

The Live Love Laugh Foundation (2018).How India perceives mental health’, National Survey Report. 

WHO (2022). Mental health: strengthening our response. World Health Organization. Retrieved September 30, 2022, from https://www.who.int/en/news-room/fact-sheets/detail/mental-health-strengthening-our-response

 

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

  समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution - Focused Brief Therapy गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांन...