शनिवार, २९ जुलै, २०२३

बायस्टँडर / प्रेक्षक प्रभाव | Bystander Effect

 

लोक बघ्याच्या भूमिकेत का असतात?

रविवार 28 मे, 2023 रात्री नऊच्या आसपास एक मुलगा दिल्लीच्या शाहबाद डेअरीजवळ रस्त्यावर उभा होता. अनेक लोक रस्त्यावरून ये-जा करत होते. साक्षी तयार होऊन मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडते. तेव्हा रस्त्यावर उभा असलेला तो मुलगा साक्षीला थांबवतो. त्यानंतर त्याने एका हाताने साक्षीला पकडून दुसऱ्या हातात चाकूने हल्ला करतो. साक्षी भिंतीजवळ पडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा पुढील दोन मिनिटात साक्षीवर चाकूने 40 हून अधिक हल्ले करतो. साक्षी रस्त्यावर पडल्यावर तो मुलगा शेजारी पडलेल्या एका मोठ्या दगडाने तिच्यावर 6 वेळा हल्ला करतो. त्यानंतर तो साक्षीला लाथ मारून तिथून निघून जातो. या दरम्यान विविध वयोगटातील किमान 17 लोक तेथून जातात. त्यांच्यामध्ये काही महिला होत्या, परंतु त्यापैकी कोणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त सुरुवातीला एक मुलगा वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर तोही निघून जातो. सुमारे अर्धा तास साक्षीचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.

काही दिवसानंतर पुण्यातही अशीच घटना दिसून आली. वर्दळीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या सदाशिव पेठेतील एका रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार लागल्यामुळे जखमी झालेली तरुणी पळत सुटली. तरुणी धावत असल्याचे बघून तिचा पाठलाग करून तो तरुण वारंवार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. पण एका तरुणाने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला म्हणून मुलगी वाचली नाही तर भलतेच घडले असते. अशीच एक घटना पुन्हा पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क या ठिकाणी संध्याकाळी सातच्या सुमारास बर्निग घाट परिसरात घडली. तेथेही लोक केवळ बघ्याची भूमिकेत होते. लोक असे का वागतात? बहुसंख्य लोक मदत न करता घटना मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्यात का गुंतलेले होते? लोकांचे नैतिक वर्तन असे का असते? शेवटी असाही प्रश्न उपस्थित होतो की, माणुसकी संपत चालली आहे का? की यामागे मानसशास्त्रीय काही कारण असू शकते. यास बायस्टँडर प्रभाव म्हणजे प्रेक्षक प्रभाव असे म्हणतात.

शनिवार, ८ जुलै, २०२३

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

 

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

एका शहरात सागर आणि प्रीती कुटुंबापासून दूर दोघेच रहात होते. त्यांना पाच वर्षाचा रोहन नावाचा मुलगा होता. दोघेही कामावर जात असल्याने तो गुंतून राहावा म्हणून त्याला मोबाईल दिलेला होता. रोहन कोणतीही गोष्ट करायची असेल तर मोबाईलशिवाय करू शकत नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मोबाईल लागायचा, जेवण करताना तर पहिली अटच ती असायची. त्याचे आई-वडील सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही.........

आज जवळपास सर्वच घरात वरील प्रसंग घडताना दिसत असेल. मुले काय खात आहेत, पीत आहेत याचे भानच राहिलेले नाही. हे भान किंवा अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे काय तर माइंडफुलनेस किंवा सजगता होय. आपण माइंडफुलनेस ही एक मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो,  मानवाला कोणत्याही प्रसंगी पूर्णपणे सचेतन राहण्याची, जागरूक राहण्याची, मन शांत ठेवून सारासार विचार करण्याची, आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव असणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर माइंडफुलनेस म्हणजे सद्य स्थितीत जगणे होय, दोन श्वासामधील जगणं होय. काही लोक आपल्या भूतकाळात जगतात, तर काही लोक आपल्या भविष्यकाळात विहार करत असतात. परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि सद्य स्थितीतला क्षण जगता आला पाहिजे. आपणास जर कायमस्वरूपी आनंदी राहायचे असेल तर आपण माइंडफुलनेसच्या मदतीने आनंदी राहू शकतो. काही लोकांचा स्वभावच असा असतो की, ते तुरूंगामध्ये जरी असले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो की त्यांना राज महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.

माइंडफुलनेस हा नेहमी आनंदी राहण्याचा एक राजमार्ग आहे. आपण विचार करत असाल की हे काय आणि कसे असते? खरं तर माइंडफुलनेस ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे आपण आपल्या आत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करतो. हे एक प्रकारचे ध्यानच आहे, फरक एवढाच आहे की, एका विशिष्ट वेळी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, माइंडफुलनेसमध्ये, आपण आपले लक्ष त्या क्षणावर केंद्रित केले पाहिजे, आपण जिथे आहोत, त्याच स्थितीत तो क्षण अनुभवणे आणि जगणे आवश्यक आहे.

असे मानले जाते की माइंडफुलनेस तंत्राच्या नियमित सरावाने आपण आनंदी राहू शकतो. वास्तविक, याद्वारे आपण वर्तमान क्षणाशी जोडतो आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारतो. आपण परिस्थिती बदलू शकत नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकतो आणि परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलू शकतो. यामुळे आपण हळूहळू प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला आणि त्यात आनंदी राहायला शिकतो. कारण आपण त्याची निवड केलेली असते “मी आनंदी आहे कारण मी आनंदी राहण्याची निवड केलेली आहे”.

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

  वरिष्ठांची आज्ञा पाळणे  |  Obedience to Authority अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्य...