शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

यशाची गुरुकिल्ली | Success Factor

 

यशाची गुरुकिल्ली

एके काळी ज्ञान प्रकाश नावाचा एक ज्ञानी माणूस आसरा नावाच्या खेडे गावात राहत होता. तो श्रीमंत आणि ज्ञानाने परिपूर्ण होता, त्याचे हे ज्ञान पाहून दूरदूरच्या ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत असत. ज्ञान प्रकाश आपल्या अनुभव आणि ज्ञानाने लोकांच्या समस्या सोडवत असत. म्हणून प्रत्येकजण त्यांना गुरुजी संबोधत असत. एके दिवसी एक तरुण गुरुजींकडे आला आणि म्हणाला - "गुरुजी, मला यशाचे रहस्य सांगा, मलासुद्धा तुमच्यासारखे विद्वान बनून माझ्या गरीबीवर मात करता यावी अशी माझी इच्छा आहे."

गुरुजी हसले आणि त्यांनी त्यांस दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या काठावर भेटण्यास बोलावले. त्या युवकाने आंघोळ करावी लागेल म्हणून आपले कपडे घेतले आणि सकाळी नदीकाठी पोहोचला. गुरुजींनी त्या तरूणास नदीच्या खोल पाण्यात नेले आणि गळ्यापर्यंत पाणी पाहून तिथे त्यांनी त्यास बुडविले. थोड्या वेळाने त्या तरूणाने धडपड करून जोरदार प्रतिकार केला तेंव्हा गुरूजीनी त्यास सोडून दिले. तरूण धापा टाकत नदीकाठी पळाला. जेव्हा त्यास आराम वाटू लागले, तेव्हा तो म्हणाला - "मला मारायचे ठरविले आहे का?"

गुरुजी म्हणाले - "नाही बाळा, मी तुला यशाचे रहस्य सांगत होतो. मला सांग जेंव्हा मी तुझ्या मानेला धरून पाण्यात बुडविले तेव्हा तुला कशाची तीव्र इच्छा झाली होती? ”

तो तरुण म्हणाला - "श्वास घेण्याची"

गुरुजी म्हणाले - "हेच यशाचे रहस्य आहे, जेव्हा आपल्याकडे यशाची दुर्दम्य इच्छा असेल तेंव्हाच आपण यश मिळवू शकतो, त्याखेरीज दुसरे कोणतेही रहस्य नाही."

विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की आपणास जे मिळवायचे आहे त्यासंबंधी आपल्या डोक्यात सदासर्वदा (जळी, स्थळी, काठी, पाषाणी) त्याचाच विचार असला पाहिजे. जर तसे नसेल तर आपणास कदाचित उशीरा यश मिळेल किंवा कदाचित मिळणारही नाही. एक हिन्दी चित्रपटातील हा संवाद यश प्राप्तीसाठी लागू पडतो.  “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.”  तसेच त्याच चित्रपटातील आणखीन एक संवाद “इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश कि है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.”

प्रत्यक्ष जीवनात असे कधी घडले आहे का की, आपण इच्छा व्यक्त केली आणि आपणास ते मिळाले, की आपण आपल्या जीवनात कोणतीच गोष्ट मनापासून इच्छिली नाही. अस कस असू शकेल की एखादी व्यक्ती कोणतीच गोष्ट मनापासून इच्छित नाही. 

गरीब माणसाला मनापासून श्रीमंत व्हायचे असते. गरीब असलेलला माणूस एकवेळ श्रीमंत होण्याची इच्छा नसेल बाळगत, परंतु आपल्याला निश्चितपणे गरीबीतून मुक्त व्हायचे आहे याची इच्छा असतेच. गरीबीतच राहायचे आहे अशी व्यक्ती आपणास आढळणार नाही. दररोज अन्न मिळविण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपली मुले कधीही उपाशी नसावीत, मुलांचे शिक्षण चांगल्या शाळांमध्ये व्हावे, जो माणूस दिवसभर खुप काबाडकष्ट करत असेल, तर त्यास दुसरे कमी कष्टाचे काम मिळवायचे नसते का. यापेक्षा अधिक कोणी मनापासून काय मागेल?

गरीबी व्यतिरिक्त चर्चा करायची असेल तर एखादा विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो, एखादा आय.ए.एस. होऊ इच्छित असेल तर त्यासाठी सलग 2-3 वर्षे कसून अभ्यास करवा लागतो. हजारो लाखो लोक आपले घर सोडून मुंबईत चित्रपटांमधील भूमिकांसाठी संघर्ष करतात. जर त्यांना मनापासून करायचे नसेल तर ते असे संघर्षपूर्ण आयुष्य जगतील का? काही स्त्रिया आपल्या पतींवर नाराज असतात तर काही पुरुष आपल्या पत्नीवर नाराज असतात. त्यांना सुखी वैवाहिक जीवन नको आहे का? जर ही इच्छा नसेल तर मनापासून असलेली वेगळी इच्छा कोणती आहे? सर्वाना जे हवे ते सर्व मिळते का? नाही ना? जे उघड आहे ते नाकारु कसे शकतो? म्हणजेच, जे प्रत्यक्षात नाही, ते कसे स्वीकारावे? याचा फायदा किंवा तोटा पाहण्यागोदार आपण याचे तंत्र मंत्र समजावून घेऊ या.

1. 'अलकेमिस्ट' - पाउलो कोहेलो यानी दुर्दम्य इच्छाशक्ती ही कल्पना आपल्या 'अलकेमिस्ट' पुस्तकात मांडलेली आहे. अशा गोष्टी आता वाचण्यास कोणाला आवडत नाही? एका मेंढपाळाने खजिना शोधण्याचे स्वप्न पाहिले. अंतःकरणातून इच्छा, विश्वाचे रहस्य, उर्जा, निसर्गाचे संकेत, नशीब इ. हे स्पष्ट आहे की त्यांचे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहे. 2014 पर्यंत याच्या 65 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या होत्या. त्याचे 80 भाषांमध्ये अनुवादही झालेले आहे. जिवंत असलेल्या सर्व लेखकांपैकी त्यांच्या पुस्तकांचे सर्वात जास्त भाषांतरित झालेले लेखक म्हणून पाउलो यांच्याकडे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

2. लॉ ऑफ अट्रॅक्शन - आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते आपणच आपल्या जीवनात इच्छित आहोत. आपण हे सर्व आपले विचार आणि स्मृतीतील प्रतिमाद्वारे आकर्षित करत आहोत. आकर्षणाचा नियम सांगतो की आपण ज्या प्रकारचे विचार आपल्या मनात करतो ते आपल्या जीवनात असेच विचार आकर्षित करतात. जर आपण सकारात्मक विचार केला तर आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिस्थिती असलेल्या लोकांना आकर्षित करतो. आपण नेहमी मनात नकारात्मक विचार ठेवल्यास आपण आपल्याकडे नकारात्मक विचार असलेल्या लोकांना आकर्षित करतो.

सृष्टीचे नियम आपल्या सर्वांसाठी समान आहेत. आपण भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा जगाच्या कोणत्याही प्रदेशात रहात असू, सृष्टीचे नियम आपल्या सर्वांसाठी एक आहेत. आपण सर्व समान नियम आणि समान सामर्थ्याने कार्य करत असतो आणि हा नियम आकर्षणाचा नियम आहे ज्यास इंग्रजीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असेही म्हणतात. आकर्षणचा नियम हे एक रहस्य आहे जे रोंडा बर्न यांनी संपूर्ण जगभर त्याचा प्रसार केलेला आहे.

फळांची अपेक्षा न बाळगता आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करणे

पहिली गोष्ट अशी आहे की मनापासून आपल्याला किती हवे असले तरीही आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतीलच. आता यावर, पाउलो असे म्हणू शकते की ज्यांना मनापासून इच्छा आहे ते कठोर परिश्रम करतील परंतु हे पुरेसे नाही. अनेक वेळा लोकांना मनापासून इच्छा असते पण ते आपला आळस सोडत नाहीत. आळशीपणा सोडण्यास इच्छुक असलेल्यांना यशाचे अनेक मार्ग सापडतात. ज्यांना मार्ग माहित आहे आणि कठोर परिश्रम करतात त्यांच्यातदेखील प्रत्येकाला सर्व काही मिळतेच असे नाही. याची काही कारण आहेत.

1. बऱ्याच ठिकाणी असणारी मर्यादित जागा - भारताच्या क्रिकेट संघात 11 खेळाडू असतात,  राखीव खेळाडू धरून 12 जन असतात, आणखीन 4-5 जन अतिरिक्त गृहीत धरू या. प्रत्येक रणजी खेळाडू ज्याची राष्ट्रीय संघात निवड थोडक्यात हुकली आहे, त्याने मेहनत केलेली नसते का? तसेच त्यास मनापासून राष्ट्रीय संघात खेळायचे नव्हते का?

त्याचप्रमाणे आय.ए.एस. किंवा आयआयटी तील मोजक्या जागेबाबत पाहूया, समजा 3000 जागा आहेत आणि अशा 50 लोकांची रँक जी 3001 आणि 3050 च्या आसपास आहे, त्यांनी कठोर परिश्रम घेतले नव्हते का? ऑलिम्पिक शर्यतीत एका मिलि सेकंदाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकू शकला नाही, तो कठोर परिश्रम केल्याशिवाय तिथेपर्यंत पोहोचला का?

ही समाजाची संकुचित वृत्ती आहे. जो जिंकला केवळ त्यालाच डोक्यावर घेतात. त्याचीच मुलाखत, तोच आदर्श, पैसा, नोकरी, त्याच्याबरोबर सेल्फी तसेच त्याचे नातेवाईक आणि शेजारी हे त्याचवर खुश असतात. त्यानेच केवळ परिश्रम घेतले. त्यालाच फक्त मनापासून ते हवे होते. जो थोडक्यात हुकला प्रत्येकजण त्याला ज्ञान देत बसतात. तुझ काहीतरी चुकत, असं करायला हव, तसं करायला हव, तु केला असतास तर योग्य झाले असते. यामुळेच कोणत्याही स्पर्धेत लोकांना खूप ताण असतो.

2. प्रत्येक गोष्ट स्पष्ट नाही – कोणतीही स्पर्धा असो त्याचे काही नियम व अटी असतात. तसेच स्पर्धेचे म्हणून काही मर्यादा असतात तर आपण एक उमेदवार म्हणून आपल्याही काही मर्यादा असतात याची जाणीव प्रत्येकास असायला हवी. प्रत्यक्ष ती परिस्थिती हाताळत असताना अनेक मानसिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक आणि शारीरिक अडथळे निर्माण होतात ज्यामुळे काही लोक स्पर्धेमधून बाहेर होतात. यश मिळविताना आपली त्यावेळची शारीरिक आणि मानसिक बळकटी आपणास मदत करते. त्यामुळे थोडक्यात नंबर हुकलेल्या उमेदवारास उपदेश देताना नदीच्या काठावर उभे राहून नसलेले ज्ञान पाजाळू नये कारण त्यामुळे तो उमेदवार नैराशेच्या गर्तेत जाण्याची शकता असते.

3. नशीब म्हणजे काय? - जर आपणास यशाचा सुरक्षित आराखडा सापडला नाही तर आपण तणावग्रस्त होतो. जगात हे असेच चालू आहे हे आपण स्वीकारण्यात अक्षम आहोत. या जगात विशिष्ट ठिकाणी पोहचण्यासाठी एकच एकच मार्ग नसून अनेक मार्ग व योजना असतात. पण आपण आपले अपयश लपविण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित वाटण्यासाठी आम्ही एक शब्द शोधला आहे तो म्हणजे नशीब. आपण योगायोगाने घडणाऱ्या घटनना निसर्गाचा संकेत मानू लागतो. कठोर परिश्रम करूनसुद्धा जर काही विचित्र होत असेल आणि आपलणास काहीही मिळत नसेल तर आपण स्वतःला सांत्वन देण्यासाठी नशिबात नाही असे मानतो. पण नशीबही सार्थ प्रयत्न करणाऱ्याच्या बरोबर असते हे विसरतो. प्रत्यक्षात जग हे खूपच सुसूत्रबद्ध आहे, एखादी गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य लोकांबरोबर घडते. आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य लोकांबरोबर राहिल्यास आपणास यश नक्की मिळू शकते.

     सर्व परिस्थिती इतकी निराशाजनक आहे का?  नक्कीच नाही, कारण आपण केवळ मनापासून एखादी इच्छा बाळगून उपयोग होत नाही तर त्यासाठी योग्य वर्तन, कृती अपेक्षित असते, ते करतो का?

आपली भूमिका काय असायला हवी:

यश हे आपण बाजारातून विकत घेऊ शकत नाही किंवा बाजारात विकली जाणारी वस्तू नाही. ते केवळ आपले प्रयत्न, आपला संयम आणि आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. असे बरेच लोक आपण पाहिले असतील ज्यांना थोडेसे यश मिळविण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्याचप्रकारे, यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो, परंतु आपण अशा काही वेगळ्या गोष्टी करून ती वेळ निश्चितपणे कमी करू शकतो. कारण प्रत्येकवेळी यश प्राप्त करताना खड्यात पडलेच पाहिजे असे काही नाही, तर आपण इतरांच्या अनुभवातून अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत. निश्चित यश प्राप्तीसाठी मदतगार ठरतील अशा काही ट्रिक्स.

1. एकला चलो रे! : जर आपणास आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर मग यशाची लढाई एकटयानेच लढली पाहिजे. जर आपणास यश हवे असेल तर आपण आयुष्यात नेहमीच एकट्याने पुढाकार घ्यायला हवा. आपणास आपले विचार, आपले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी स्वत: करावी लागेल. एकट्याने चालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपणास अनेक बरे वाईट अनुभव मिळत जातात. एकत्र राहून आपण कधीही ते अनुभव घेवू शकत नाही. जर एखादी समस्या आली तर त्याचे व्यवस्थापन कसे करावे, या समस्येचे निराकरण कसे होईल. या समस्या आपल्याला बरेच काही शिकवतील. त्यामुळे जीवनात एकट्याने अनेक समस्यांचे उकल होत असते. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला आणि सर्वात महत्त्वाचे दुसऱ्याच्या सावलीत आपण स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही; त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते.

2. ध्येयप्राप्तीसाठी नियोजन हवे:  जेव्हा ध्येय हा शब्द येतो तेव्हा नियोजन तिथे सर्वात प्रथम येते. नियोजन केल्याशिवाय कोणतेही लक्ष्य साध्य होऊ शकत नाही. आपल्या उद्दिष्टांचे कोणतेही नियोजन नसल्यास भविष्यात आपण आपल्या ध्येयापासून विचलित होवू आणि आपले मुख्य लक्ष्य पूर्ण होणार नाही. म्हणूनच, यशासाठी आपण आपल्या ध्येयांची संपूर्ण योजना तयार करणे आणि नंतर आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी मनापासून एकत्रित होणे खूप महत्वाचे आहे. जर आपले ध्येय मोठे असेल तर आपण त्यास बर्‍याच लहान भागांमध्ये विभागू शकतो. अशाप्रकारे आपणास वेळापत्रक बनविण्याचा फायदा होईल जेणेकरून आपण आपला वेळ आणि शक्ती योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम असू.

3. यशाचा मार्ग खडतर: जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या प्रयत्नानी यशाच्या पायर्‍या चढते तेव्हा बरेच लोक त्यास खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही मोठी कार्य किंवा ध्येय सुरू करताना बर्‍याच नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात. तसेच आपणास सुरूवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोक आपल्या ध्येयांपासून आपले लक्ष विचलित करू शकतात, आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच अनेक लोक आपणास नकारात्मक प्रतिक्रिया देतील आणि टीकाही करतील परंतु आपणास अशा अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागेल. आपणास आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण यश मिळविण्याचा तयार महामार्ग अस्तित्त्वात नाही.

4. आपला संयम कायम हवा:

आपले ध्येय गाठायचे असेल तर आपणास संयम राखता आला पाहिजे. या जगातल्या सर्व महान पुरुषांमध्ये ही गोष्ट सामान्य होती आणि धैर्य त्यांचा स्वभाव होता. आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल, पण आपणास हवे असलेले यश न मिळाल्यास आपण नाराज होतो. ज्यावेळी धैर्य आपली परीक्षा घेते त्यावेळी संयम आपल्या कमी येते. आपण ती परिस्थिती कशी हाताळतो यावर आपले यश अवलंबून असते म्हणून योग्य वेळी संयम बाळगल्यास आपण आतापर्यंत केलेली मेहनत फळाला येते. जर आपण कठीण परिस्थितीत संयम राखला असेल तर मग आपणास जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संयम म्हणजे दुबळेपणा नसून स्वत:विरुद्ध पुकारलेले बंड असते, इच्छा, आकांक्षा आणि सहज प्रवृत्ती उफाळून वर येत असताना मनाला घातलेला आवर होय.

5. प्रयत्नातील सातत्य:  

यशस्वी होण्यासाठी शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची टिप म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. अनेक लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यांना सतत प्रयत्न करण्याची भीती असते. जेव्हा ते होत नाही तेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या प्रयत्नात यश हवे असते. पहिल्याच प्रयत्नात महान लोकांदेखील यश प्राप्त झालेले नाही. त्यांनाही यश मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागले.

अब्राहम लिंकन यांना अमेरिकेचे अध्यक्ष होण्यापूर्वी बर्‍याच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि स्वतःला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून सिद्ध केले. जर त्यांनी पहिली किंवा दुसरी निवडणूक हरल्यानंतर आपला पराभव स्वीकारला असता. तर आज अमेरिकेच्या इतिहासात त्यांना स्थान नसते. 

जर आपणास मोठे यश हवे असेल तर आपण सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. सतत प्रयत्न करून, आपणास आपले ध्येय आणि उद्दीष्टांच्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात. त्यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर प्रयत्नातील सातत्य, चिकाटी आणि स्मार्ट वर्क या गोष्टी कामी येतात. ‘So, Best Wishes

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

अधिक वाचनासाठी पुस्तके:

लीच आणि ओक (2017). यशाचे सूत्र दुसरी आवृत्ती, पुणे: जायको बुक्स  

खान आणि लिमये (2009). यशाची गुरुकिल्ली, मुंबई: तन्वीर पब्लिकेशन    

पाउलो कोहेलो आणि कोत्तापल्ले (2014). द अल्केमिस्ट, पुणे: पद्मगंध प्रकाशन

बर्न, रोंडा (2010). सिक्रेट रहस्य, पुणे: मंजुळ पब्लिशिंग हाऊस   

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य | Balanced Diet and Mental Health

संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य 

आपण जगण्यासाठी खातो कि खाण्यासाठी जगतो? हा खुप गहन प्रश्न आहे, कारण बरेच लोक अभिमानाने म्हणतात की ‘आपण खाण्यासाठी जगतो आहोत’. याचा अर्थ कोणतेही ध्येय नसणारे लोकच असे बोलू शकतात. कारण ध्येयवेड्या लोकांना अन्न पाण्याचीही शुद्ध नसते. अन्नाशी आपला संबंध खूप गुंतागुंतीचा आहे. अन्न पदार्थाचे मूल्य, त्यांची उपलब्धता आणि आजूबाजूच्या लोकांच्या खाण्याच्या सवयी यावर हा संबंध अवलंबून आहे. आपण मनुष्य म्हणून इतरांना एक गोष्ट सामायिक करत असतो आणि केंव्हाही भेटल्यावर एका गोष्टीची विचारपूस करत असतो ती म्हणजे ‘आबा/ काका जेवलात का?’ किंवा चहा-पाणी झाले का? आपले आयुष्य हे पोटाची खळगी भरण्यातच वाया घालवतो असे 50 ते 60 टक्के लोकाना वाटत असते.  तसेच टिचभर पोटासाठी आयुष्याचे रान करणारे लोकही आपण अवतीभोवती पाहत असतो. 

भुकेमुळे आपले शरीर आपणास इंधनाची आवश्यकता आहे असे सांगत असते. तथापि,  खाण्याची इच्छा फक्त भुकेशी संबंधित नाही तर याचा संबंध इतर गोष्टींशीही असतो. कारण भूक नसतानाही बर्‍याच वेळा आपण खातो आणि अनेकदा भूक असतानाही खात नाही. अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की अन्नाशी संबंधित बरेच संकेत आपल्या खाण्याच्या इच्छेवर परिणाम करतात. जेवण तयार करताना होणारा आवाज, गंध आणि जाहिराती. पहिल्या दोन गोष्टी सामान्य आहेत पण जाहिरात ही अलिकडे आपल्या जीवनात अनावश्यक गोष्टी खाण्यास प्रवृत्त करते असे संशोधनातून आढळून आलेले आहे. तसेच काही खानपान तर स्टेटस सिंबॉल  मानले जातात, जसे पिझ्झा, बर्गर आणि सॉफ्ट ड्रिंक्स इ. बरेचदा मित्र मैत्रिणी बरोबर चिल्ल करतानाही असे आरोग्यास कमी महत्त्वाचे खाद्यपदार्थ रिचवले जातात. 

खाण्याची आपली इच्छा नेहमी सारखी नसते. हे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात बदलते. खाण्याची इच्छा वयाबरोबर बदलत जाते. खाण्याबद्दल बोलतांना, सामान्य माणसाच्या जीवनात या चढ-उतारांचे सात टप्पे येत असतात. त्यांच्याविषयी आपली समज वाढवून आपण कमी खाणे किंवा जास्त खाण्याचे आव्हान सोडवू शकतो. तसेच खाण्याच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर लठ्ठपणाचे दुष्परिणाम नियंत्रित करू शकतो.

आयुष्यातील सुरुवातीचा टप्पा (1-10 वर्षे)

या काळात मुलांची वाढ खूप वेगाने होत असते. या काळातील त्यांचे खानपानाच्या सवयी या मोठे होईपर्यंत परिणाम करतात. जर एखादा लहानपणी लठ्ठ असेल तर तो मोठेपणीही लठ्ठ राहण्याची शक्यता असते. अनेक मुलांना बर्‍याचदा काही पदार्थ खाण्यास आवडत नाहीत. काहीवेळ दुर्लक्ष करा परंतु अशा गोष्टी मुलांना पुन्हा पुन्हा चाखून, त्यांच्या आरोग्याबद्दलचे महत्त्व सांगून, त्यांना भाज्या, फळे यासारखे निरोगी पदार्थ खाण्याची सवय लावू शकतो.

मुलांनाही खाताना स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास शिकवायला हवे. विशेषतः ते किती खातात हे नम्रपणे व शांतपणे सांगावे. त्यांच्या अनावश्यक खानपानाकडे कटाक्षाने लक्ष ठेऊन वेळीच योग्य संतुलित आहार उपलब्ध करून दिला पाहिजे जेणेकरून लठ्ठपणाकडे होणारी वाटचाल थांबू शकेल. पालक बर्‍याच वेळा मुलांना ताटात वाढलेले जेवण पूर्णपणे खाण्यास भाग पाडतात, त्यामुळे मुलाना अधिक खाण्याची सवय आपणच लावतो. ताटात असलेले संपूर्ण भोजन संपवताना मुले पोटात जागा शिल्लक नसतानाही संपूर्ण अन्न अक्षरश: कोंबतात. नंतरच्या दिवसांत त्यांना अधिक खाण्याची सवय लागु शकते.

आजकाल अनेक देशांमध्ये मुलांना जंक फूडच्या जाहिरातींपासून वाचवण्याची मोहीम सुरू आहे. या जाहिराती फक्त टीव्ही किंवा रेडिओवरच येत नाहीत, तर अ‍ॅप्स, होर्डिंग्ज, सोशल मीडिया आणि व्हिडिओ ब्लॉगिंगद्वारे मुलांना प्रेरित करतात.

आपल्या मुलास आवश्यक असलेल्या उष्मांक आणि प्रथिने हे त्याचे वय आणि वजन यावर अवलंबून असते. याकाळात संतुलित आहार घेतल्यास आपल्या मुलास अतिरिक्त जीवनसत्त्वे किंवा खनिजे घेण्याची आवश्यकता नाही. तरी आपल्या मुलास कोणतेही जीवनसत्व किंवा खनिजपूरक आहार देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दुसरा टप्पा (10-20 वर्षे)

पौगंडावस्थेत शरीराची वेगाने वाढ होत असते. हार्मोन्समुळे मूड आणि वर्तन नियंत्रित केले जाते. या काळातील खाण्याच्या सवयी या नंतरच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावतात. किशोरवयीन मुलांमध्ये खाण्यापिण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. म्हणजेच, पौगंडावस्थेतील खानपान त्याच्या पुढच्या पिढीवर देखील परिणाम घडवून आणतो.

दुर्दैवाने, सद्याच्या परिस्थितीत सल्ला आणि मार्गदर्शनाअभावी पौगंडावस्थेतील मुलांना खाण्यापिण्याविषयीच्या चुकीच्या सवयी लागतात जे त्यांच्या आरोग्यासाठी वाईट असतात. या वाईट सवयींचा परिणाम मुलांपेक्षा अधिक मुलींवर होतो, कारण या वयात त्यांच्या शरीरात प्रजनन प्रक्रिया म्हणजेच मासिक पाळी सुरू झालेली असते. त्यामुळे अनेक मुलींना या सवयीमुळे त्रास झालेला पाहायला मिळतो.

किशोरवयीन मुलांना दररोज आवश्यक असलेल्या कॅलरी आणि प्रोटीनचे प्रमाण त्याचे वय आणि वजनावर अवलंबून असते. किशोरवयीन मुले खेळ किंवा फिटनेस कार्यक्रमामध्ये सक्रिय असल्यास वाढीसाठी आवश्यक कॅलरी आणि प्रथिने जास्त लागतात. याकाळात संतुलित आहार घेतल्यास किशोरवयीन मुलांना अतिरिक्त जीवनसत्त्वे किंवा खनिजे घेण्याची आवश्यकता नाही. तरी किशोरवयीन मुलांना कोणतेही जीवनसत्व किंवा खनिजपूरक आहार देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

तिसरा टप्पा (20-30 वर्षे)

तारुण्यामुळे आयुष्यात अनेक बदल घडून येतात. अनेक युवक महाविद्यालयात जात असतात,  एखाद्याचे लग्न झालेले असते किंवा कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध जुळलेले असतात. या काळात बरेच लोक पालकही बनतात. या सर्व कारणांमुळे, मुलींचे वजन वाढणे अपेक्षित आहे. एकदा शरीरात चरबी जमा झाली की त्यातून मुक्त होणे फार कठीण असते. जेव्हा आपण आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा कमी खातो तेव्हा आपले शरीर खूप जलद संकेत देत असते. परंतु जेव्हा आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो तेव्हा त्याला प्रतिबंधित करणारे संकेत खूपच कमकुवत असतात. अशी अनेक शारिरीक आणि मानसिक कारणे आहेत ज्यामुळे आपणास  अधिक वेळ कमी खाण्याची सवय कायम राखता येत नाही.

अलीकडील एक नवीन प्रकारचे संशोधन सुरू झाले आहे. याअंतर्गत, कमी खाल्ल्यानंतर लोकांना बरे वाटावे यासाठी मार्ग तयार केले जात आहेत. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी हे संशोधन प्रभावी ठरू शकते कारण भूक लागल्यामुळे आपण बर्‍याचदा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खातो. वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या मेंदूला वेगवेगळे संकेत देतात. हेच कारण आहे की बरेच आइस्क्रीम खाऊनही मेंदू आपणास थांबण्याचे संकेत देत नाही. कारण चरबी आपल्या मेंदूस असे खाणे बंद कारण्याचे संकेत देत नाही. हेच कारण आहे की समोसे, चाट-पकोडे किंवा कचोरी खाताना आपण किती खात आहोत याची कल्पनाच नसते! त्याचवेळी, प्रथिनेयुक्त पदार्थ किंवा अधिक पाणी असलेले फलाहार घेतल्यामुळे आपले पोट त्वरीत भरते आणि आपण बर्‍याच काळासाठी तसा अनुभव घेतो. त्यामुळे चटपटीत आणि तात्काळ बनणारे अन्न पदार्थ टाळून आरोग्यास हितकारक अन्न घटक सेवन केले पाहिजेत.

चौथा टप्पा (30-40 वर्षे)

उद्योग- व्यवसाय करण्याच्या या वयात पोटाच्या आव्हानाशिवाय इतरही अनेक आव्हाने आपल्यासमोर येतात. अनेक कारणाने तणाव वाढतो आणि तणावामुळे 80 टक्के लोकांच्या खाण्याच्या सवयी प्रभावित होतात. काही लोक ताण-तणावात जास्त खायला लागतात, तर काहीजण अन्न सोडून देतात. ताण-तणाव हाताळण्याच्या या पद्धती बर्‍याचदा न समजण्यायोग्य असतात. कामाबद्दल प्रामाणिकपणा आणि प्रत्येक काम चांगलेच करण्याची सवय देखील आपल्या खानपान आणि ताण-तणावाशी संबंधित आहेत.

असे कामाचे वातावरण तयार करणे ज्यामध्ये ताण-तणाव कमी असेल, कामावर असलेल्या लोकांनी जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाऊ नयेत. कंपन्यांनी कर्मचार्‍यांना असे स्वस्त भोजन दिले पाहिजे जे आरोग्यासाठी हितकारक असेल. यामुळे कर्मचारी निरोगी बनतील आणि सदृढ कर्मचारी अधिक चांगले काम करतील यात शंका नाही.

पाचवा टप्पा (40-50 वर्षे)

आहार हा शब्द ग्रीक भाषेच्या डायटियामधून आला आहे. याचा अर्थ, 'जीवन जगण्याचा मार्ग किंवा जीवनशैली'. पण आपण सर्व सवयींचे गुलाम आहोत. वाईट सवयी सोडून दिल्यास आपलाच फायदा होईल हे माहीत असूनही आपण आपल्या सवयींमध्ये बदल करण्यास सहसा तयार नसतो. लोकांना वजन कमी करायचे आहे, परंतु समोसा-कचोरी आणि तत्सम तळलेल्या, भाजलेल्या, जादा उष्मांकयुक्त पदार्थ खाणे सोडायचे नसते. आता हे कसे शक्य आहे?

      खाण्याच्या सवयी न बदलता आपण निरोगी शरीर आणि निरोगी मन कसे मिळवू शकतो? खाण्यापिण्याचे चांगले किंवा वाईट परिणाम आरोग्याशी संबंधीत असल्याचे अनेक संशोधन सूचित केलेले आढळते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की धूम्रपान करणे, अयोग्य खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि मद्यपान करण्याची सवय ही आपल्या जीवनशैलीवर होणाऱ्या दुष्परिणामांची प्रमुख कारणे असून त्यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते. 40 ते 50 वयोगटातील लोकांच्या आरोग्यानुसारच त्यांनी आपल्या खण्यापिण्याच्या सवयी विकसित कराव्यात. तथापि, अनेक लोक ब्लडप्रेशर किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्यामुळे आरोग्य खराब होण्याच्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आणि योग्य वेळी योग्य पाऊले उचलत नाहीत. त्यामुळे पुढे जाऊन खुप मोठी किंमत मोजावी लागते.

सहावा टप्पा (50-60 वर्षे)

वयाच्या 50 वर्षानंतर मानवी शरीरातील स्नायूंची ताकत कमी होऊ लागते. दरवर्षी अर्धा ते एक टक्का दराने हे घसरण सुरू असते. शरीराची क्रियाशीलता आणि चपळता कमी होऊ लागाते. स्त्रियांमध्ये प्रोटीन कमी झाल्यामुळे आणि रजोनिवृत्तीमुळे स्नायूतील ताकत वेगाने कमी होण्यास सुरवात होते.

      या काळात निरोगी आणि सर्व प्रकारच्या संतुलित आहाराचा प्रयत्न केल्यास वयाचा परिणाम जाणवणार नाही. या वयातील व्यक्तीस जास्त प्रथिनेयुक्त आहाराची आवश्यकता असते, जे सहसा पूर्ण होत नाही. सध्या बाजारात उपलब्ध प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ आपल्या गरजा भागवू शकत नाहीत. त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींसाठी सकस आणि प्रथिनेयुक्त  संतुलित आहार अपेक्षित आहे.

सातवा टप्पा (60-70 वर्षे आणि त्यापुढील)

आजकाल मनुष्याचे सरासरी वयोमान वाढलेले आहे. अशा परिस्थितीत आपणास जीवन निरोगी बनवण्याच्या आव्हानापेक्षा जास्त इतर गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आपण आरोग्यदायी जीवनशैली न स्वीकारल्यास आपला समाज वृद्ध, दुर्बल आणि अपंग लोकांनी भरून जाईल.  वृद्धावस्थेत पोषणाचे महत्त्व वाढते. कारण या वयात भूक कमी लागते त्यामुळे हे लोक कमी खातात. खाण्यामध्ये रुचि कमी होते त्यामुळे शरीराचे वजन कमी होते, अशक्तपणा वाढतो आणि अल्झाइमर सारख्या विकारामुळे विसरण्याचा धोका वाढतो.

या वयोगटातील लोकासाठी अन्न हा एक सामाजिक अनुभव असतो. म्हातारपणात, जोडीदार निघून गेल्यानंतर किंवा कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर, एकट्याने जेवणे म्हणजे स्वकियाकडून मिळणारा आराम आणि आनंद दूर होतो. त्याबरोबरीने म्हातारपणात दात पडणे, पोट साफ न होणे आणि गिळण्यास होणारा त्रास वाढतो. आपण पिकू हा चित्रपट पाहिला असाल तर याची अनुभूती मिळेल.  

या वयोगटातील लोकांना अन्नाची चव आणि गंध जाणवत नाही. परिणामी, खाण्याची इच्छा आणखी कमी होते कारण लोक त्यातून मिळणाऱ्या आनंदापासून वंचित राहतात. या काळात आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात अन्न हे आपल्या शरीराचे इंधन तर आहेच त्याबरोबरीने हा एक असा सामाजिक-सांस्कृतिक अनुभव आहे ज्याचा आनंद लुटता आला पाहिजे.

सारांश:

आपण सर्वजन खाण्यामध्ये तज्ञ आहोत, कारण आपण दररोज खातो. म्हणून, प्रत्येक वेळी अन्नाचा आनंद घेण्याची संधी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे आणि चांगले आणि चवदार अन्न आपल्या आरोग्यासाठी अनेक मूल्ये मिळवून देते हे आपणास समजले पाहिजे. 

नाश्ता राजासारखा, दुपारचं जेवण गरीबासारखं आणि रात्रीचं जेवण फकीरासारखं असावं अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजे सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते. नाश्ताबद्दल सर्वाधिक संशोधन हे लठ्ठपणाशी असलेल्या संबंधीत होतात. अमेरिकेमध्ये 50 हजारांहून अधिक लोकांवर एक संशोधन करण्यात आले. जे लोक सकाळचा नाश्ता करतात, त्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) संतुलित असल्याचे  आढळले तर रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांचा BMI जास्त आढळला. संशोधकांच्या मते नाश्ता केल्याने आपणास समाधान मिळते आणि रोज कमी कॅलरी खर्च होते. नाश्तामुळे इतर खाण्या-पिण्यावरही नियंत्रण येते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये घेतले जाणारे पदार्थ हे तंतुमय आणि पौष्टिक असतील तर नंतरच्या जेवणाप्रती इन्सुलिनची संवेदनशीलताही वाढते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जोखमीचं ठरू शकते पण सर्वसामान्य लोकांना फायद्याचे असते. आजकाल लठ्ठपणा हा एक आजार झालेला आहे पण शरीरात वाढणाऱ्या ‘कॉर्टीसॉल’ या रासायनिक द्रव्यामुळे खाण्याची इच्छा वाढते.  कॉर्टीसॉलमुळे शरीरातील मांसधातू बिघडतो आणि चरबीचे प्रमाण वाढते. जर एखाद्याचा मांसधातू बिघडला तर आहार कमी असला तरी देखील चरबी वाढत राहते. कॉर्टीसॉल हे रासायनिक द्रव्य अतिताण, मनाची टोकाची घालमेल आणि असह्य मानसिक दडपण यामुळे वाढते. त्यामुळे ताण-तणाव आणि घरातील वातावरण आनंदी ठेवले पाहिजे.

समोर आलेला पदार्थ मनापासून, सावकाश, प्रत्येक घासाची चव मनापासून घेत खाल्ला पाहिजे. बत्तीस वेळा बारीक चावून खाल्लेलं अन्न अंगी लागतं अशी आपली आज्जी, काकी व आई सांगते ते उगीच का! आजकाल डाएट, कॅलरी, वेळ कमी या सगळ्या नादात आपण मनापासून खाणं, भुकेच्या वेळेला खाणं आणि आवश्यक खाणं विसरून गेलेलो आहोत. खाण्याच्या बाबतीत भूक लागल्यावर खाणे, प्रत्येक घासाचा आनंद घेणे, जेवताना ताण-तणाव बाजूला ठेवणे, कधीतरी मनाचेही ऐकणे अशा काही साध्या गोष्टी पाळल्या, तरी वजन आटोक्यात राहाण्यास मोठी मदत होईल आणि पर्यायाने मानसिक आरोग्य छान राहील.  त्यामुळे आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे जे पिकते ते आनंदाने खावे कोणीही काहीही सांगितले तरी आपणास जे पचते, मनाला जे रुचते आणि खिशाला जे परवडते ते खावे. शेवटी मस्त खा आणि स्वस्थ रहा.


(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ: 

Marsico, Katie (2015). Eat a Balanced Diet, Michigan: Cherry lake Publishing

Spilsbury, L. (2009). A Balanced Diet, New York: Heinemann Library

Veitch, Catherine (2012). Healthy Eating a Balanced Diet, London: Raintree book

बाखरू, ह. कृ. (2012). आहाराद्वारे उपचार सर्वसामान्य आजारांवर, मुंबई: रोहण प्रकाशन

बाखरू, ह. कृ. (2012). गुणकारी आहार, मुंबई: रोहण प्रकाशन

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

स्वप्नांचा मानसशास्त्रीय मागोवा | Dreams psychological analysis

 

स्वप्नांचा मानसशास्त्रीय मागोवा

फार पुरातन काळापासून माणूस त्याला पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. आपणास भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा निसर्ग आपल्याशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार, शास्त्रज्ञ आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितलेले आढळते.

आपण झोपी जात असताना, जागृतावस्थेत एखाद्या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरलेल्या समस्यांवर आपले सुप्त मन कार्य करत राहते. अनेकांना याचा अनुभव आलेला असेल की झोपल्यानंतर काहीवेळाने त्या समस्येवर उत्तर सहज सापडले आहे. असेच काही शास्त्रज्ञांची उदाहरणे आहेत ज्यांना झोपेत असताना मोठे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत.

दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी मांडली. रसायनशास्त्रातील हा एक अमूलाग्र बदल आणि शोध होता. यातील बहुतांश मूलद्रव्ये त्यांना स्वप्नात दिसून आले होते. तसेच प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ रामानुजन हा असे मानत असे कि  जेव्हा त्याला गणितातील एखादा प्रश्न/ प्रमेय सुटत नसे तेव्हा त्याच्या स्वप्रात त्याचे उत्तर मिळत असे.  प्रेडरिक केकुल ह्या जर्मन शास्त्रज्ञास स्वप्नात बेन्झीनच्या रेणूची रचना कशी असेल त्याचे उत्तर मिळाले होते. वैज्ञानिक पद्धतीचा जनक रेने देकार्त यानेही आपल्या शास्त्रीय योगदानाचे श्रेय आपल्या स्वप्नांना दिलेले आहे. अशा अनेक कथा आख्यायिकांमुळे स्वप्न आणि त्यांच्या गुढतेचे आवरण तयार झाले. असे असले तरी स्वप्नांचा शास्त्रीय अभ्यास किंवा मानसशास्त्रीय अभ्यास विसाव्या शतकातच सुरु झाला.

स्वप्नांच्या माध्यमातून सामान्य बोधावस्थेमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतो. झोपेच्या वेळी एखाद्याच्या मनात उद्भवणारे विचार, प्रक्रिया, भावनिक चढउतार असा स्वप्नांचा अर्थ लावता येतो. स्वप्न पाहणे सहसा REM (डोळ्यांची तीव्र हालचाल) झोपेशी संबंधित असते. डिमेंट अँड क्लीटमॅन (1957) यांच्या अभ्यासानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीस  REM झोपेतून उठविले, तेव्हा त्यांनी पाहिलेले  80% स्वप्न सांगितले तर NREM (डोळ्यांची हालचाल होत नसते) झोपेमधून उठविले तेंव्हा व्यक्ती केवळ 7% स्वप्नाचे वर्णन करू शकली. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी स्वप्नांचा सविस्तर अभ्यास केला आहे आणि त्या आधारे स्वप्नांशी निगडीत पुढील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

स्वप्न किती काळ टिकून राहते? आधुनिक संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की एखाद्या व्यक्तीने पाहिलेले स्वप्न वास्तविक जीवनातल्या घटनेपर्यंत टिकते. या वस्तुस्थितीच्या पुष्टीसाठी डेमेंट अँड वुल्फर्ट (1958) यांच्या अभ्यास मदत करते. या अभ्यासामध्ये, REM झोपेमधून उठवले गेले ज्यामध्ये ती व्यक्ती स्वप्न पाहत होती आणि त्यांना आपल्या स्वप्नाबद्दल बोलवायस सांगण्यात आले, त्यांना असे आढळले की स्वप्नातील वर्णन करण्यास जवळजवळ REM झोपेइतकाच समान वेळ लागला. यामुळे हा निष्कर्ष निघाला की स्वप्नातील घटना वास्तविक जीवनात घडतात तितक्या कालावधी टिकतात. काही मानसशास्त्रज्ञांनी अशा स्पष्टीकरणावर आक्षेप घेतला आहे आणि असे म्हटले आहे की स्मृतिभ्रंशामध्ये वापरल्या जाणार्‍या कार्यपद्धतीतील दोषांमुळे ते वैज्ञानिक मानले जाऊ शकत नाही.

सर्व लोक स्वप्न पाहतात का? मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की प्रत्येकजण स्वप्न पाहतो. फरक एवढाच की झोपेतून उठल्यानंतर काही लोकांना स्वप्नांतील दृश्यांचा आणि प्रतिमांचा यशस्वीरित्या पुनरुच्चार करता आला तर काही लोकांना असे करणे अवघड गेले. काही मानसशास्त्रज्ञांचे असे मत आहे की काही लोकांना REM झोपेमधून उठणे खूप सोपे जाते ज्यामुळे, अशा व्यक्ती पाहत असलेल्या स्वप्नांचे अधिकाधिक वर्णन करण्यास सक्षम असतात तर काही लोक असे आहेत की त्यांना REM झोपेतून जागे होणे अवघड जाते, त्यामुळे ते पाहत असलेल्या स्वप्नांचे वर्णन करण्यास सक्षम नसतात.  

लोकांना स्वप्न पाहताना त्या प्रक्रियेची माहिती असते का? मानसशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे दिलेले आहे. मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की लोकांना त्यांचे स्वप्न ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाऊ शकते आणि जेव्हा त्यांना जाणीव होते की ते स्वप्न पाहत आहेत तेव्हा स्वप्नांच्या स्वयंचलित प्रवाहावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. सॅलेमी (1970) यांनी एक अभ्यास केला ज्यामध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा स्वप्न पडत असेल तेव्हा त्याला चालू स्विच बंद करण्याचे यशस्वी प्रशिक्षण दिले गेले होते. यावरून हे सिद्ध होते की एखाद्या व्यक्तीला स्वप्ने पाहतानाही त्याची जाणीव असते, त्यामुळे त्याच्या उत्स्फूर्त प्रवाहाचा कोणताही परिणाम त्यावर  होत नाही.

लोक स्वप्नातील एखाद्या विषयावर नियंत्रण ठेवू शकतात का? मानसशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे उत्तर देखील 'होय' असे दिलेले आहे आणि म्हटले आहे की स्वप्नातील विषयावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य आहे. रोफवर्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी (1978) एक अभ्यास केला ज्यामध्ये ही वस्तुस्थिती यशस्वीरित्या दर्शविलेली आढळते. या लोकांनी त्यांच्या झोपेपुर्वी काही कालावधीसाठी लाल रंगाचा चष्मा घालण्यासाठी दिला आणि त्यानंतर स्वप्नातील त्याच्या प्रभावाचा अभ्यास केला. या संशोधानामधून प्रत्येक स्वप्नाच्यावेळी असे दिसून आले आहे की त्याच्या स्वप्नांतील अधिकतर देखावा हा लाल रंगात आढळला. येथे प्रयोगकर्त्याने कोणतीही स्पष्ट सूचना दिली नव्हती, तरीही झोपण्यापुर्वी काही काळ लाल चष्मा घातला पाहिजे ही एक प्रकारची गुप्त सूचना होती त्यास आंतरीक स्वप्नपुर्व सुचना असे म्हणतात. कार्टराईट (1974) यांनी केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार स्पष्ट आंतरीक स्वप्नपुर्व सूचनेच्या परिणामाचा अभ्यास केला गेला, ज्यामध्ये स्वप्नापूर्वी प्रयुक्तास असे सांगितले गेले होते की स्वप्नात असे काही विनम्र भावना दिसतील जे स्पष्टपणे पाहण्याचा प्रयत्न करा. या संशोधनातून असे निष्कर्ष दिसून आले की बर्‍याच प्रयुक्तांना किमान एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये त्यांना ती इच्छित विनम्रता दिसली. स्वप्नातील या भिन्न परिमाणांबद्दल जाणून घेतल्यानंतर, त्यांच्याबद्दलच्या भिन्न विचार प्रवाहाबद्दल जाणून घेणे अपेक्षित आहे.

स्वप्नाबद्दलचे विविध विचारप्रवाह

स्वप्नाचे सैद्धांतिक स्पष्टीकरण देण्यासाठी अनेक प्रकारचे दृष्टिकोन उपलब्ध आहेत, त्यापैकी मनोविश्लेषण दृष्टिकोन, माहिती प्रक्रिया दृष्टिकोन आणि सक्रिय-संश्लेषण सिद्धांत या तीन मुख्य विचार प्रवाहांचा विचार करूया :

1. मनोविश्लेषण दृष्टिकोन – मनोविश्लेषण विचारसरणीचे प्रमुख प्रवर्तक सिग्मंड फ्रॉइड हे आहेत. फ्रॉइड यांनी अबोधावस्थेबद्दल जाणून घेण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे स्वप्न होय असे म्हंटले आहे. एखादी व्यक्ती अबोधावस्थेतील इच्छा आणि प्रेरणा स्वप्नात पूर्ण करून घेते. म्हणूनच त्यांनी आपल्या स्वप्न सिद्धांतास इच्छापूर्ती सिद्धांत म्हटलेले आहे. अबोधावस्थेतील अशा इच्छा ज्या अनैतिक, लैंगिक इ. आहेत ज्या रोजच्या जीवनात पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत त्या इच्छा स्वप्नात व्यक्त केल्या जातात. म्हणूनच फ्रॉइडने स्वप्नास अबोधावस्थेतील शाही मार्ग म्हटलेले आहे.  

मनोविश्लेषण विचारसरणीनुसार हे स्पष्ट आहे की, स्वप्नात व्यक्ती जे काही पहाते ते सर्व अबोधावस्थेतील वासनांचा इच्छित प्रकार आहे. याचा अर्थ असा आहे की अबोधावस्थेतील दमण केलेल्या वासना त्यांचे वास्तविक स्वरूप बदलतात आणि स्वप्नात दिसू लागतात. हे वास्तविक रूप किंवा विषय स्वप्न-विश्लेषणानंतर उघडकीस आलेले आहेत. फ्रॉइडच्या मते, स्वप्नाचे दोन विषय आहेत – व्यक्त सामग्री आणि सुप्त सामग्री. स्वप्नातील व्यक्त केलेला विषय स्वप्नातील विषय, तथ्ये आणि घटनांचा संदर्भ देतो जे व्यक्ती स्वप्नात थेट पाहते आणि जेव्हा झोपेची वेळ येते तेव्हा त्याचे वर्णन करते. स्वप्नातील सुप्त सामग्री स्वप्नात पाहिलेल्या घटना आणि तथ्यांमागील छुपे अर्थ दर्शवते, जे स्वप्न-विश्लेषणानंतर आपल्याला सापडते. याचा अर्थ असा आहे की स्वप्नातील सुप्त विषय हा दडलेल्या इच्छेचा स्वभाव आहे, ज्यांचा स्वभाव बऱ्याचदा अनैतिक, तर्कहीन आणि विचित्र असतो. अशा इच्छा थेट बोधावस्थेच्या सेन्सॉरशिपमुळे स्वप्नात व्यक्त केल्या जात नाहीत. परिणामी, त्यांचे रुपातरंण होऊन स्वप्नात व्यक्त होतात. स्वप्नातील प्रकट सामग्री म्हणून स्वप्नातील सुप्त सामग्री बदलत असलेल्या यंत्रणेस स्वप्न यंत्रणा म्हणतात. अशा पाच स्वप्न यंत्रणा खालीलप्रमाणे आहेत-

दृढीभवन - या स्वप्नांच्या प्रक्रियेत अबोधावस्थेतील अधिकाधिक इच्छांना आपापसात सहकार्य करून एक छोटा किंवा संक्षिप्त रूप तयार करून व्यक्त केले जाते.

विस्थापन - या स्वप्नांच्या प्रक्रियेत, अबोधावस्थेतील इच्छा संबंधित व्यक्ती किंवा वस्तूमध्ये व्यक्त करण्याऐवजी इतर एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या रूपात व्यक्त केली जाते.

प्रतिकीकरण - या स्वप्नांच्या प्रक्रियेत, अबोधावस्थेत दडपलेल्या इच्छा काही प्रतीक म्हणून स्वप्नात व्यक्त केल्या जातात. उदाहरणार्थ, स्वप्नांमध्ये लहान भावंडे लहान प्राणी आणि कीटकांद्वारे दर्शविली जातात.

नाट्यीकरण - या स्वप्नांच्या प्रक्रियेत, अबोधावस्थेतील व्यक्तीच्या लैंगिक आणि अनैतिक इच्छा स्वप्नांच्या रूपात प्रकट होतात. ज्याप्रमाणे नाटक किंवा चित्रपटातील घटना दृश्य रूपात येतात, तशाच प्रकारे नाट्यीकरणमध्ये, स्वप्नातील घटना देखील आपल्यासमोर एकामागून एक येत असतात. स्वप्नांच्या या घटना दृश्य, श्राव्य, स्पर्श आणि गंधाशी अधिक संबंधित असतात.

दुय्यम विस्तार - स्वप्ने पाहताना झोप मोडल्यानंतर त्वरित एखादी व्यक्ती स्वप्नात विखुरलेली तथ्ये, घटना इत्यादीं एकत्र करू लागते. त्या प्रक्रियेस दुय्यम विस्तार म्हणतात.

फ्रॉइडने मांडलेल्या या विचारप्रवाहाचा सर्वात मोठा दोष असा आहे की त्याने स्वप्नांबद्दल जे सांगितले त्यातील अचूकतेची तपासणी करण्याची कोणतीही शास्त्रीय पद्धत नाही. स्वप्नांच्या विश्लेषणासाठी त्याने कोणतेही स्पष्ट नियम तयार केले नाहीत किंवा अशा प्रकारचा अर्थ सांगता येईल अशी कोणतीही पद्धत त्यानी दिलेली नाही. म्हणूनच आजकाल बरेच मानसशास्त्रज्ञानी अबोधास्थेच्या स्वप्नाबद्दल आक्षेप घेतला आहे. फ्रॉइडचा शिष्य आणि सहकारी युंग यानेही फ्रॉइडच्या या विचारसरणीला फारसे महत्त्व दिले नाही आणि स्पष्टपणे सांगितले की स्वप्नांमध्ये पुनरावृत्ती घटना महत्वाच्या असतात आणि अशा घटना या स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या सामूहिक अबोधावस्थेचा भाग असते आणि आदिरूपाचे प्रतिनिधित्व करतात. परिणामी, मानसशास्त्रज्ञांनी स्वप्नांबद्दल वैकल्पिक विचारधारा प्रस्तावित केलेल्या आढळतात.

2. माहिती-प्रक्रिया दृष्टिकोन - या विचारसरणीनुसार, व्यक्तीच्या लपलेल्या वासना आणि आवेग स्वप्नात प्रतिबिंबित होत नाहीत, तर स्वप्नाद्वारे रात्री मेंदूतून उपलब्ध असलेल्या जटिल क्रियांची झलक दिसते. या विचारसरणीनुसार अशा स्वप्नाना काहीही अर्थ नसतो. स्वप्नात, व्यक्ती दिवसभर आपल्या कृतीतून प्राप्त झालेल्या अनुभव किंवा माहितीच्या समान माहिती आणि संवेदनांवर प्रक्रिया करते. या विचारसरणीस स्वप्नांचा बोधात्मक सिद्धांत देखील म्हणतात कारण स्वप्नामध्ये माहिती प्रक्रिया, स्मृती आणि समस्या निराकरण देखील असते. आहे. या संदर्भात, इव्हान्सने व्यक्त केलेली मते (1984) बरीच महत्त्वाची आहेत. इव्हान्सनच्या सिद्धांतानुसार झोपेच्या वेळी मेंदू एखाद्या व्यक्तीस त्याच्या दैनंदिन जीवनात प्राप्त झालेल्या माहितीवर प्रक्रिया करतो. आपण स्वप्नात जे काही पाहतो ते मेंदूतल्या या चालू असलेल्या प्रक्रियेचे प्रतिबिंब असते. इव्हान्सनच्या मते, स्वप्नांचे दोन प्रकार आहेत - टाइप ‘ए’ स्वप्न आणि टाइप "बी" स्वप्न. टाइप '' स्वप्न REM झोपेच्या दरम्यान होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचा संदर्भ देते जे स्वतःच घडत असते. व्यक्तीला या प्रक्रियांची बोधावस्थेच्या पातळीवर माहिती नसते टाइप बी स्वप्न '' स्वप्नाचा प्रकार दर्शवते जो माणूस REM झोपेतून उठल्यानंतर त्याला स्वप्न आठवते. '' स्वप्नादरम्यान एखाद्याच्या मेंदूला विविध प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करण्याची झलक आपल्या स्वप्नाद्वारे प्राप्त होते, टाइप 'बी' च्या स्वप्नादरम्यान मेंदूस जाणीव असते आणि मेंदूद्वारे केल्या जाणार्‍या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची झलक पाहण्यास सक्षम असते. जेव्हा हे घडते, मेंदूत त्या माहितीचा अर्थ देखील लावाल जातो अशा प्रकारे, इव्हान्सनच्या मते, 'बी' स्वप्नातील '' स्वप्नाच्या वेळी प्रक्रिया करीत असलेल्या माहितीची संपूर्ण झलक मिळते.

स्वप्नाबद्दल आणखी एक विचारसरणी ही क्रिक अँड मिचिसन (1983) यानी मांडली. यांना असा विश्वास आहे की स्वप्नांचा विस्मरणाशी संबंध आहे. दुसऱ्या शब्दांत, स्वप्न एखाद्यास दीर्घ-कालीन स्मृतीमधून इच्छित माहिती काढून टाकण्यास मदत करते. जर एखादी व्यक्ती मेंदूमधून अशी माहिती आणि साहचर्ये काढून टाकण्यास असमर्थ असेल तर मेंदू या इच्छित आणि अनावश्यक माहितीने भरून जाईल. स्वप्नात मेंदू जेव्हा एखादे कार्य पूर्ण करतो तेव्हा मेंदूमध्ये होणाऱ्या मज्जापेशीय क्रियांचा यादृच्छिक नमुना दर्शविला जातो. या सिद्धांतानुसार स्वप्नातील घटनांची उजळणी करणे चांगली कल्पना नाही, कारण एखाद्या व्यक्तीमध्ये त्या विचारांचे नमुने पुन्हा आठवल्याने मेंदूमध्ये अनावश्यक माहितीने भरून जाईल. त्यामुळे स्वप्नांना त्यांच्या पातळीवर सोडून दिलेले बरे असते.  

3. सक्रिय-संश्लेषण सिद्धांत - हा स्वप्नाचा जैविक सिद्धांत आहे जो आज फ्रॉइडच्या सिद्धांतास कठोर आव्हान देत आहे. मेंदूच्या अंतर्गत सखोल रचनांमधून यादृच्छिक विद्युत स्त्राव स्त्रवतो ज्यामुळे स्वप्न पडतात असे हा सिद्धांत गृहित धरतो. असे संकेत मेंदूच्या मेंदुस्कंध मधून उद्भवतात आणि मेंदूच्या बाह्य मस्तिष्काच्या प्रदेशांना उत्तेजित करतात. अशा सक्रियतेमध्ये केवळ जैवरासायनिक ऊर्जा समाविष्ट असते. या यादृच्छिक विद्युत चुंबकीय संकेतामध्ये तार्किक संबंध किंवा सुसंगत नमुना नसतो. फ्रॉइडच्या मते, स्वप्न पाहणाऱ्याकडून अप्रिय आणि निषिद्ध कर्म टाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. परंतु मेंदू या यादृच्छिक घटनांना संबंधित मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अशा सर्व घटनांमधून काही अर्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, या विद्युत उत्तेजनांच्या विभाजन आणि विविध कंपनांवर एक आच्छादन घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच, मेंदूतील मज्जापेशींचा एक संच सक्रियता निर्माण करतो आणि दुसरा त्यात संश्लेषण तयार करतो. हेच कारण आहे की स्वप्नांच्या या सिद्धांतास सक्रिय-संश्लेषण सिद्धांत म्हटले जाते.

या सिद्धांताचे प्रवर्तक मॅककार्ले आणि हॉबसन (1977) यांच्या मते REM झोप बाह्य उत्तेजना रोखून एखाद्या व्यक्तीच्या मेंदूला अंतर्गत उत्तेजनाने भरते, ज्यामुळे मेंदूचा वाढ आणि विकास शक्य होते. स्वप्नातील सामग्री तयार करण्याची अबोध इच्छा नव्हे तर हे या यादृच्छिक उत्तेजनांमधून होते. जेव्हा या अर्थहीन उत्तेजनांचे संश्लेषण केले जाते, तेव्हा स्वप्न परिचित आणि अर्थपूर्ण दिसू लागतात.

अशा प्रकारे झोपेचे स्पष्टीकरण रहस्यमय तत्त्वानुसार देखील केले जाते. REM झोपेच्या वेळी, मेंदूमध्ये मज्जापेशींचा एक संच असतो जो एसिटिल्कोलीन किंवा आच स्त्राव सोडतो, जी प्रत्यक्षात स्वप्नातील सामग्री किंवा मूलभूत तथ्ये असतात. जेव्हा मज्जापेशींचा हा संच आच स्त्राव सोडतो, तेव्हा सेरोटोनिन आणि नॉरेपिनेफ्रिनमधून बाहेर पडलेल्या मज्जापेशींचा दुसरा संच बंद करतो. मेंदूतील ही दोन रसायने अशी आहेत जी स्मृतीत माहिती संग्रहित करण्यास आवश्यक मानले जातात. एखादी व्यक्ती दोन कारणांमुळे स्वप्नातील मोठा भाग विसरते. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा स्वप्नामध्ये सेरोटोनिन आणि नॉरेपिनेफ्रिनचे स्त्रवणे बंद असते, स्वप्नातील घटना कायमस्वरुपी स्मृतीमध्ये रुपातंरीत होत नाहीत. दुसरे म्हणजे, स्वप्नातील घटना थोड्या काळासाठी अल्प-कालिक स्मृतीत जमा होतात, म्हणून त्या विसरल्या जातात. सक्रिय-संश्लेषण सिद्धांतामध्ये स्वप्नांना एक प्रक्रिया म्हणून वर्णन केले जाते ज्याद्वारे एखादी व्यक्ती झोपेच्या वेळी अगदी यादृच्छिक उत्तेजनांपासूनही अर्थपूर्ण व्याख्या करण्याचा प्रयत्न करते.

वय आणि लिंग यांचा स्वप्नांशी संबंध

मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासांवरून हे स्पष्ट झाले आहे की एखाद्या व्यक्तीचे लिंग आणि वय स्वप्नांवर बराच प्रभाव पाडते. हॉल अँड कॅसल (1986) यांनी एक अभ्यास केला ज्यामध्ये त्यांनी १०० महिला आणि १०० पुरुषांच्या स्वप्नांचे विश्लेषण केले आणि ते खालील निष्कर्षांवर पोहोचले:

(i) स्त्रिया पहात असलेली स्वप्ने ही घरगुती वातावरणाशी संबंधित असतात, परंतु पुरुषांची स्वप्ने अनोळखी आणि बाह्य वातावरणाच्या घटनेशी अधिक संबंधीत असतात.

(ii) स्त्रियांच्या स्वप्नांमध्ये अधिकतर एक विशिष्ट ओळखीची व्यक्ती असते, तर पुरुषांच्या स्वप्नांमध्ये कोणतीही विषष्ट व्यक्ती नसून व्यक्तींचे समूह असतात.

(iii) शारीरिक स्वरूपाच्या वर्णनावर स्त्रियांच्या स्वप्नांमध्ये जोर देण्यात आलेला असतो, परंतु पुरुषांच्या स्वप्नांमध्ये याउलट असते.

(iv) पुरुषांच्या स्वप्नांमध्ये, आक्रमकता, लैंगिक, शारीरिक उत्तेजन आणि कर्तृत्वाशी संबंधित कार्यक्रम प्रामुख्याने असतात. परंतु या गोष्टींची उणीव स्त्रियांच्या स्वप्नांमध्ये असल्याचे आढळते आणि त्यांच्या स्वप्नात आक्रमकता, गती इत्यादि सूक्ष्म आणि अप्रत्यक्ष पद्धतीने वापरल्या जातात.

(v) प्रौढांच्या बहुतेक स्वप्नांमध्ये, त्यांच्या इच्छा तृप्त झाल्याचे दिसून येते तर मुलांच्या बहुतेक स्वप्नांमध्ये भीती असते.

स्वप्नासंबंधी काही रोचक तथ्ये:  

आपण आपले 90% स्वप्ने विसरतो; जागे झाल्यानंतर 5 मिनिटांत आपले अर्धे स्वप्न विसरले जाते तर 10 मिनिटाच्या आत 90% विसरले जाते. आंधळे लोक देखील स्वप्न पाहतात, जन्मानंतर आंधळे झालेल्या व्यक्ती त्यांच्या स्वप्नांमध्ये प्रतिमा पाहू शकतात. अंध जन्मलेल्या व्यक्ती कोणतेही दृष्य पाहू शकत नाहीत, परंतु त्यांच्या स्वप्नांमध्ये ध्वनी, गंध, स्पर्श आणि भावना या इतर संवेदनांमध्ये तितकेच स्पष्ट दृश्य असतात. आपल्या स्वप्नांमध्ये आपण केवळ ओळखीचे चेहरे पाहू शकतो. स्वप्ने प्रतीकात्मक असतात, आपण एका रात्रीत पाच ते सात स्वप्ने पाहू शकतो. आपण घोरत असू तर आपण स्वप्न पाहू शकत नाही.


(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:

Cartwright, R.D. (1974). A Primer on Sleep and Dreaming, Addison-Wesley, Reading, Massuchusetts

Crick and Mitchison (1983). The function of dream sleep, Nature Vol. 304pages111114

Dement, W., & Kleitman, N. (1957). The relation of eye movements during sleep to dream activity: an objective method for the study of dreaming. Journal of experimental psychology, 53(5), 339.

Dement, W., & Wolpert, E. A. (1958). The relation of eye movements, body motility, and external stimuli to dream content. Journal of Experimental Psychology, 55(6), 543–553.

Evans, F. J. (1984) Hypnosis and sleep: Techniques for exploring cognitive activity during sleep. In: Hypnosis: Research developments and perspectives, ed. E. Fromm & R. E. Shor. Aldine/Atherton

Freud, S. (1953). The interpretation of dreams. Standard Edition of the works of Sigmund Freud, Vol. 4, 5, Transl. by J. Strachey. London: Hogarth Press. (Originally published 1900.)

McCarley R W and Hobson J A (1977). The brain as a dream state generator: an activation-synthesis hypothesis of the dream process, The American journal of psychiatry, Vol. 134/12, pp. 1335-48.

Roffwarg, Herman and Barker (1978). Similarity of eye movement characteristics in REM sleep and the awake state. Psychophysiology, Vol. 20, 537-43.

Salamy, J. (1970). Instrumental responding to internal cues associated with REM sleep. Psychonomic Science, 18, 342-343.

समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती (SFBT) | Solution-Focused Brief Therapy

  समाधान-केंद्रित संक्षिप्त उपचार पद्धती | Solution - Focused Brief Therapy गौतम बुद्ध दररोज वेगवेगळे उदाहरणे दाखले देऊन आपल्या शिष्यांन...