शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1

राग व्यवस्थापन भाग 1 | Anger Management part 1 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. रिस्टॉटल

तथागत गौतम बुद्धांच्या जीवनात घडून गेलेली एक घटना. शाक्य आणि कोलिया राज्यांच्या दरम्यान वाहणाऱ्या रोहिणी नदीचे पाणी अडवून दोन्ही राज्यातील लोक आपल्या पिकांना पाणी देत ​​असत. एकदा जेष्ठ महिन्यात पिके सुकलेली पाहून शाक्य आणि कोलिया या दोन्ही राज्यातील रहिवास्यांनी आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी रोहिणी नदीवर आले. आपल्या शेतात आधी पाणी कोण देणार? यावरून त्यांच्यात भांडण सुरु झाले. ही बातमी त्यांचे महसूल प्रतिनिधीकडून सेनापतीद्वारे शाक्य व कोलिया राजांना मिळाली. सर्व सेवक, सैन्य आणि सेनापती एकत्र आल्याने तलवारी बाहेर आल्या. जेव्हा सैन्य एकमेकाशी लढायला निघाले तेव्हा रोहिणी नदीच्या किनाऱ्यावर तथागत बुद्ध ध्यान करत बसले होते त्यामुळे ही बातमी त्यांना मिळाली. ते युद्धासाठी सज्ज असलेल्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. तेंव्हा शाक्य आणि कोलिया राज्यातील सर्वजणांनी शस्त्रे टाकून तथागत बुद्धाना नमन केले.

तथागत बुद्ध म्हणाले महाराज, हे कसले भांडण? लढा कशासाठी? दोन्ही राज्यांचे राजे म्हणाले की आम्हाला कारण माहित नाही. तथागत बुद्ध म्हणाले मग कारण कोणास ठाऊक असेल? कारण विचारात न घेता विनाकारण तलवारी काढल्या! कारणाचा शोध तरी घ्यायचा! राजे म्हणाले की कदाचीत सेनापतीला माहित असावं, सेनापतीनी सैन्य प्रमुखाकडे बोट दाखवलं, सैन्य प्रमुखाकांनी सैनिकांकडे बोट दाखवलं आणि शेवटी प्रकरण नोकरांपर्यंत पोहोचलं, तेंव्हा कोठे जाऊन कारण कळलं की भांडण हे पाण्यामुळे सुरु आहे. बुद्ध म्हणाले पाण्यामुळे! इथे नेहमीच पाणी वाहत असते, उद्याही ते वाहत राहणार त्यामुळे लढा पाण्यामुळे होऊ शकत नाही. सेवक म्हणाले की आधी पाणी कोणी वापरायचे यावरून लढा सुरु आहे. तेंव्हा बुद्ध म्हणाले, पाण्यामुळे भांडण होऊच शकत नाही. त्यामुळे पाण्याला दोष देऊ नका.

बुद्ध हसले आणि शाक्य आणि कोलियांच्या प्रमुखांना विचारले की, महाराज, पाण्याची किंमत काय आहे? राजा खूप लाजला आणि लाजून म्हणाला, अत्यल्प तसे पाहिल्यास काहीच नाही. पाण्याची किंमत ती काय! आणि बुद्धाने मानवांबद्दल विचारले, राजा आणखी संकोचला आणि म्हणाला की अमूल्य मानवापेक्षा अधिक मौल्यवान काय आहे! बुद्ध म्हणाले, मग विचार करा, अत्यल्प मूल्यासाठी तुम्ही अमूल्य नष्ट करणार आहात का? पाण्यासाठी रक्त सांडणार आहात का? आणि नदी अशीच वाहत राहील. एकमेकांना माराल किंवा तुम्ही स्वतः मराल; पण नदी अशीच वाहत राहिली, नदीला कळणारही नाही. तत्त्वशून्य गोष्टीसाठी आपण आपले अमुल्य गोष्ट गमावणार का? खडे आणि दगडांसाठी हिरे-माणिके फेकणार आहात का? म्हणूनच तुमच्या आयुष्यात दु:ख, चिंता आणि अंधार आहे. तथागत बुद्धांच्या बोलण्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते काय करत होते याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी पाणी तंटा सामंजस्यानी, सामोपचाराने वाटाघाटी करून सोडविला. अशाप्रकाराने रागातून आणि द्वेषभावनेतून सुरु झालेलं भांडण सकारात्मक पद्धतीने समाप्त झाले. पण मुळात राग का येतो? राग येण स्वाभाविक आहे का? राग येण्याची कारणे काय आहेत? कारण माहित झाल्यास त्यावर काही उपाय करता येतील का?

राग म्हणजे काय?

राग येणे हे पूर्णपणे सामान्य असून ती नैसर्गिक निरोगी मानवी भावना आहे. परंतु जेव्हा ती नियंत्रणाबाहेर जाते आणि विध्वंसक होते, तेव्हा त्यामुळे कामाच्या ठिकाणी, वैयक्तिक नातेसंबंधात आणि जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे राग ही एक मनाची अवस्था असून ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. जेव्हा इच्छेविरुद्ध काही घडते आणि ते स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम निट करू शकत नाही. मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आहे. म्हणून राग ही एक मनाची नकारात्मक अवस्था आहे. अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्‍य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची संरक्षण यंत्रणा असते.

राग ही एक "भावनिक अवस्था असून ती सौम्य चिडण्यापासून ते तीव्र संताप आणि क्रोध यामध्ये बदलते," रागाचा अभ्यास करणारे मानसशास्त्रज्ञ चार्ल्स स्पिलबर्गर यांच्या मते, इतर भावनांप्रमाणे रागामुळे शारीरिक आणि जैविक बदल घडतात; जेव्हा आपणास राग येतो, तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढते, त्यामुळे ऊर्जा संप्रेरकांची पातळी वाढते.  

रागाची कारणे

शाक्य आणि कोलिया लोकांच्यामध्ये उद्भवलेले भांडण हे काही पाण्यामुळे नसून त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. पाणी हे केवळ निमित्त किंवा तात्कालिक कारण असू शकते. पण प्रत्यक्षात अनेकवेळा अशा छुल्लक घटना घडून गेलेल्या असतील त्या डोक्यात ठेवल्याने यावेळी त्याचा उद्रेक झालेला पाहायला मिळाले आणि तथागत बुद्धांनी अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि कौशल्याने तंटा मिटविला. हे जरी असले तरी रागाचे मूळ काय असू शकते.

मनाला लागलेले अपयश, अन्याय किंवा निराशा यासारख्या अंतर्गत घटना आणि मालमत्ता किंवा विशेषाधिकारांचे नुकसान, उपहास किंवा अपमान यासारख्या बाह्य घटना या दोन्ही घटनांमुळे राग येऊ शकतो. आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर (जसे की सहकारी किंवा पर्यवेक्षक) किंवा परिस्थितीवर (ट्रॅफिक जाम, रद्द केलेली फ्लाइट) रागावू शकतो किंवा आपणास आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल चिंता किंवा विचार केल्यामुळे राग येऊ शकतो. क्लेशकारक किंवा संतापजनक घटनांच्या आठवणीदेखील संतप्त भावनांना उत्तेजन देऊ शकतात.

अ) जीवशास्त्रीय घटक: राग निर्माण होण्यास मेंदूतील कुंभखंड (टेंपोरेल लोब) आणि किनारी संस्था (लिंबिक सिस्टिम) कारणीभूत असते. तसेच विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था, ॲड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण, डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग देखील रागास कारणीभूत ठरू शकतात.

ब) अनुवांशिक घटक: रागाची भावना आनुवंशिक असू शकते. जसे XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती आणि अनुवांशिक व्यक्तिमत्त्व दोष असणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

क) मानसशास्त्रीय घटक: अति स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती, चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती, सारासार विचार न करता मत बनवणाऱ्या व्यक्ती, संशयीवृत्ती असणाऱ्या व्यक्ती, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती, न्यूनगंड, लैंगिक दमन करणाऱ्या व्यक्तींना सामान्य व्यक्तींच्या तुलनेत लवकर राग येतो.

आपल्या रागाचे प्रमाण किती असते?

काही प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत ज्या राग या भावनांची तीव्रता मापन करतात, आपणास किती राग येतो आणि तुम्ही ते किती चांगले हाताळता यांचे विश्लेषण त्याद्वारे करता येते. जर तुम्हाला रागाची समस्या आहे आणि तुम्हाला ते आधीच माहित असेल तर तिचा बिनशर्त स्वीकार करून त्यावर काम करा. जर तुम्ही नियंत्रणाबाहेर आणि भयावह वाटणाऱ्या मार्गांनी राग व्यक्त करत असाल, तर तुम्हाला या भावनांना सामोरे जाण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधण्यासाठी मदतीची आवश्यकता असू शकते.

यासाठी स्टेट-ट्रेट अँगर एक्स्प्रेशन इन्व्हेंटरी (STAXI-2) ही सर्वात व्यापकपणे वापरली जाणारी राग शोधिका आहे. स्पिलबर्गर यांनी 1999 मध्ये त्याची सुधारित आवृत्ती आणलेली आहे. एकूण 57 विधाने असून रेटिंग चार-पॉइंट स्केलवर आहेत आणि स्थिती आणि वैशिष्ट्य याद्वारे रागचे मापन केले जाते. सदर चाचणी 16 वर्षांपेक्षा अधिक वयोगट असणाऱ्या कोणालाही देता येते.

काही लोक इतरांपेक्षा जास्त का रागावतात?

राग व्यवस्थापनात माहिर असलेले मानसशास्त्रज्ञ जेरी डेफेनबॅकर यांच्या मते, काही लोक खरोखरच इतरांपेक्षा जास्त "गरम" असतात; त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक सहज आणि तीव्रतेने राग येतो. असेही काही लोक आहेत जे त्यांचा राग जाणवेल असा व्यक्त करत नाहीत परंतु किरकिरे आणि चिडखोर असतात. सौम्यपणे रागावलेले लोक नेहमी शिव्याशाप देत नाहीत आणि वस्तूही फेकत नाहीत; कधीकधी ते सामाजिकरित्या माघार घेतात, निराश होतात किंवा शारीरिकदृष्ट्या आजारी पडतात.

काहीही कारण नसताना काही लोक सहज रागवतात, जसे ते रागाच्या काठावर बसलेले आहेत किंवा काही लोकांना केवळ निमित्त हवे असते रागवण्यासाठी. असे लोक गोष्टी किंवा घटनेतील चांगली बाजू न पाहता केवळ नकारात्मक अंगाने विचार करून जे काही चुकीचे घडत आहे ते त्यांच्याच बाबतीत घडत आहे असा समज करून घेऊन नेहमी रागाच्याच पावित्र्यात असतात. तर काही लोक विशेषतः परिस्थिती विशिष्ट प्रमाणात अन्यायकारक वाटल्यास ते रागावतात कारण त्यांना हक्क आणि जबाबदाऱ्या माहित असतात.

रागाचे संभाव्य धोके काय आहेत?

अनेक लोक अतिरागाला केवळ एक मानसिक समस्या मानतात. ते एक ढोबळपणे केलेले विधान आहे. जेव्हा आपण रागावतो तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था (ऑटोमिक नर्वस सिस्टीम) उत्तेजित होते. उदाहरणार्थ, आपल्या छुप्या नात्यासंबंधीचे पितळ उघड पडल्याने उद्भवलेल्या रागामुळे अनुकंपी (सिम्प्यथेटिक) मज्जासंस्था आणि संबंधित हार्मोनल आणि न्यूरोकेमिकल बदल होण्याची शक्यता असते. या शारीरिक प्रतिक्रियांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रतिसाद, श्वासोच्छ्वास आणि घाम, सक्रिय स्नायूंना रक्त प्रवाह आणि ताकद वाढू शकते. जसजसा राग कायम राहतो, तसतसा त्याचा परिणाम शरीराच्या अनेक प्रणालींवर होतो, जसे की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, रोगप्रतिकारक शक्ती, पाचक आणि मध्यवर्ती मज्जासंस्था. यामुळे हायपरटेन्शन आणि स्ट्रोक, हृदयविकार, जठरासंबंधी आजार आणि आतड्यांसंबंधी रोग, तसेच जखम बरे ना होण्याचा धोका वाढतो आणि काही प्रमाणात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की राग हा हृदयविकाराचा एक मुख्य जोखीम घटक आहे. अनेक प्रकारच्या परिस्थितींमध्ये, वारंवार राग अनुभवण्याची प्रवृत्ती असणे, याला राग प्रवण अवस्था म्हणून ओळखले जाते. एका अभ्यासात सलग तीन वर्षे सामान्य रक्तदाब असलेल्या आणि राग प्रवण अवस्था असलेल्या लोकांमध्ये ह्रदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांसंबंधीचा धोका दोन ते तीन पटीने वाढलेला आढळला. आणखी एका अभ्यासात रागावर नियंत्रण कमी असलेल्या व्यक्तींना प्राणघातक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा सर्वाधिक धोका आढळला. अनेक संशोधनाच्या आधारे, तज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की राग प्रवण, दीर्घकालीन शत्रुत्व, रागाची अभिव्यक्ती आणि तीव्र रागाच्या घटनांमुळे वारंवार हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकृती होऊ शकते. जेव्हा राग वारंवार, तीव्र स्वरुपाचा आणि चिरकाल असतो त्यापेक्षा राग माफक प्रमाणात अनुभवला जातो आणि ठामपणे व्यक्त केला जातो तेव्हा तो कमी व्यत्यय आणतो.

सदर लेखाचा उर्वरित भाग आपण पुढील लेखात पाहू या.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)


शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

झायगार्निक प्रभाव | Zeigarnik effect

 

झायगार्निक प्रभाव | Zeigarnik effect

अपूर्ण कामांबद्दलच्या विचारांमुळे तुम्हाला कधी त्याचा त्रास झाला आहे का? कदाचित पूर्ण न झालेल्या कामाच्या प्रकल्पाबद्दल किंवा अर्धवट वाचलेल्या कादंबरीच्या कथानकाबद्दलचे विचारचक्र आपणास झोपू देत नाहीत. अपूर्ण आणि अडथळा असलेल्या कार्यांबद्दलचे विचारचक्र थांबवणे इतके कठीण का आहे तर याचे एक कारण आहे. मानसशास्त्रज्ञ याला झायगार्निक प्रभाव म्हणतात, किंवा पूर्ण केलेल्या कामांपेक्षा अपूर्ण कार्ये अधिक लक्षात ठेवण्याची प्रवृत्ती असे म्हणतात. म्हणून तर आपण हजार कामे व्यवस्थित केलेली असतील आणि एखादे काम केलेले नसेल तर त्याच्यावरच सगळ्यांचे लक्ष जाते.

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम सुरू करतो पण ते पूर्ण करत नाही, तेव्हा आपण इतर गोष्टींकडे वळलो तरीही अपूर्ण कामासंबंधीचे विचार आपल्या मनात येत राहतात. असे विचार आपणास मागे जाण्याची आणि आपण अगोदर सुरू केलेली गोष्ट पूर्ण करण्यास उद्युक्त करतात. म्हणूनच अनेक रोमांचक व उत्सुकता वाढविणाऱ्या कांदबऱ्या अधिक का वाचल्या जातात? किंवा रोमांचक व उत्सुकता वाढविणारे चित्रपट का अधिक बघितले जातात?. तसेच आपणास जिंकेपर्यंत व्हिडिओ गेम का खेळावेसे वाटते. कारण आपण इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरीही अपूर्ण कामाचा प्रभाव पडत राहतो.

साधारण २०१६ मध्ये बाहुबली हा चित्रपट आला आणि सगळ्यांच्या डोक्यात एक विचार घोळत राहिला तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारले? याचे खरे उत्तर बाहुबली 2 ची कथा समोर आल्यावरच कळली. तसेच डेलीसोप आणि टीव्ही मालिका या प्रभावाचा फायदा घेतात. कारण एपिसोड संपेल, पण कथा अपूर्ण असते. अलिकडे नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राईम सारख्या ओटीटी प्लटफर्मवर दर्शकांना खिळवून ठेवतात आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ते पुढील वेळी ट्यून करणे लक्षात ठेवतील यासाठी झायगार्निक प्रभाव काम करतो.

झायगार्निक प्रभावाची सुरुवात

मानसशास्त्रामध्ये असा एक मानसिक प्रभाव आहे त्यास त्याच्या शोधकर्त्याच्या नावावरून ओळखले जाते. या सिद्धांताची सुरुवात विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, सोव्हिएत मानसशास्त्रज्ञ ब्लूमा झायगार्निक आणि तिचे मार्गदर्शक कर्ट लेविन यांच्याबरोबर व्हिएन्नामधील एका व्यस्त रेस्टॉरंटमध्ये बसले असताना लेविनने तिचे लक्ष एका विचित्र नियमिततेकडे वेधले. वेटरने नोट्सचा अवलंब न करता ऑर्डरचे सर्व तपशील उत्तम प्रकारे लक्षात ठेवले. पण ते पूर्ण केल्यावर, आधीच्या पाहुण्यांनी नेमके काय ऑर्डर दिली हिती ते त्याला आठवत नव्हते.

तिने नोंदवले की वेटर्सना न चुकता ऑर्डर चांगल्याप्रकारे आठवत होत्या. एकदा बिल भरल्यानंतर मात्र, वेटरना ऑर्डर्सची नेमकी माहिती लक्षात ठेवण्यात अडचण आली. वेटरशी बोलल्यानंतर, त्यांना असे कळले की त्यास सर्व ऑर्डर आठवणीत होत्या, परंतु त्याने नुकतीच कोणती कामे पूर्ण केली आहेत हे आठवत नव्हते. यावरून एखादी व्यक्ती स्वत:साठी त्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्ण आणि अपूर्ण कामे लक्षात ठेवते असे मत झायगार्निक यांनी मांडले. आपल्या प्रबंधात स्मरणशक्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य प्रस्थापित केले आणि त्याचे वर्णन केले: आपण पूर्ण केलेल्या क्रियांपेक्षा अपूर्ण क्रिया अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो.

झायगार्निक प्रयोग

प्रयोगांच्या अनेक मालिका तिने घेतल्या, त्यामध्ये सहभागींना स्ट्रिंगवर मणी ठेवणे, कोडी सोडविणे किंवा गणिताच्या समस्या सोडवणे यासारखी सोपी 15 ते 20 कार्ये पूर्ण करण्यास सांगितले गेले. एक तासाच्या विलंबानंतर, झायगार्निकने सहभागींना ते कशावर काम करत होते याचे वर्णन करण्यास सांगितले. तिला असे दिसून आले की ज्यांच्या कामात व्यत्यय आणला होता त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता ज्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केली होती त्यापेक्षा दुप्पट होती.

प्रयोगाच्या दुसर्‍या आवृत्तीत, तिला आढळले की प्रौढ सहभागी पूर्ण झालेल्या कामांपेक्षा 90 टक्के जास्त वेळा अपूर्ण कार्ये लक्षात ठेवण्यास सक्षम होते. "On Finished and Unfinished Tasks" असे शीर्षक असलेल्या पेपरमध्ये झायगार्निकच्या सुरुवातीच्या अभ्यासाचे वर्णन 1927 मध्ये प्रकाशित झालेले आहे. प्रयोगांमध्ये प्रयुक्तांना अनेक बौद्धिक समस्या सोडवाव्या लागतात. समस्येचे निराकरण यादृच्छिकपणे करण्यासाठी निश्चित वेळ सेट न करता वेळ कालबाह्य झाली आहे असे कोणत्याही वेळी ती घोषित करत असे जेणेकरून समस्या अपूर्ण राहतील. काही दिवसांनंतर, प्रयुक्तांना देण्यात आलेल्या कार्यांची यादी करण्यास सांगितले असता, असे आढळून आले की समस्येच्या निराकरणात व्यत्यय आणल्यास त्यांना ते काय करत होते हे लक्षात ठेवण्याची शक्यता प्रत्यक्षात पूर्ण केलेल्या कार्यापेक्षा दुप्पट होती, या वैशिष्ट्यास झायगार्निक प्रभाव म्हणतात. झायगार्निकला असेही आढळले की एखाद्या कार्याची सुरूवात स्मृतीत एक व्होल्टेज तयार करते, जे कार्य पूर्ण होईपर्यंत डिस्चार्ज होत नाही. ते पूर्ण होण्यासाठी, कार्य साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते. जर कार्य सेट केले गेले आणि पूर्ण झाले नाही, तर आपला मेंदू आपल्याला याची आठवण करून देत राहतो आणि आपण त्या विचारांसह अनैच्छिकपणे त्याकडे परत जातो. हा प्रभाव आपल्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर दिसून येतो. बहुदा, प्रत्येक व्यक्तीस त्याची कार्ये पार पाडायची असतात आणि पूर्णतेचा अनुभव घ्यायचं असतो.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने झायगार्निक प्रभाव

तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर परीक्षेच्या आदल्या रात्रभर अभ्यास करण्यापेक्षा तुमचे अभ्यासाचे सत्र खंडित स्वरूपाचे असावे. सलग अभ्यास न करता ठराविक अंतराने विश्रांती घेऊन पुन्हा नव्या दमाने अभ्यास केल्यास लक्षात राहण्यास मदत होते. त्यामुळे अधिक विषयांचा अभ्यास करून, तुम्हाला चाचणीच्या दिवसापर्यंत लक्षात राहण्याची शक्यता जास्त असेल.

जर तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी अवघड जात असेल, तर क्षणिक व्यत्यय तुमच्या फायद्यासाठी कार्य करू शकतो. माहितीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करण्याऐवजी, त्याचे काही वेळा पुनरावलोकन करा आणि नंतर विश्रांती घ्या. तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असताना, तुम्ही अभ्यास करत असलेल्या माहितीकडे मानसिकदृष्ट्या परत येत असता.

दिरंगाईवर मात करण्यासाठी

बर्‍याचदा, आपण अंतिम क्षण येत नाही तोपर्यंत काम हाती घेत नाही, अंतिम मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यासाठी शेवटच्या क्षणी केवळ धावपळीत पूर्ण करतो. दुर्दैवाने, या प्रवृत्तीमुळे केवळ मोठ्या प्रमाणावर ताणच येतो असे नाही, तर यामुळे कामगिरीदेखील खराब होऊ शकते.

दिरंगाईवर मात करण्याचा एक मार्ग म्हणून झायगार्निक प्रभाव कार्य करतो. कोणतेही काम कितीही लहान असले तरीही पहिले पाऊल उचलून सुरुवात करा. एकदा तुम्ही तुमचे काम सुरू केल्यावर—परंतु पूर्ण झाले नाही—तर, शेवटी, तुम्ही ते पूर्ण करेपर्यंत स्वतः त्या कार्याचा विचार कराल. आपण हे सर्व एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही, परंतु आपण उचललेले प्रत्येक लहान पाऊल आपल्याला आपल्या अंतिम ध्येयाच्या जवळ घेऊन जाते.

हा दृष्टीकोन केवळ तुम्हाला कार्य पूर्ण करण्यास प्रवृत्त करत नाही, तर एखादे काम पूर्ण केल्यानंतर आणि आपली मानसिक शक्ती इतरत्र लागू करण्यास सक्षम झाल्यावर काहीतरी प्राप्त केल्याची भावना देखील निर्माण करू शकते.

आवड आणि लक्ष वेधून घेणे

ग्राहकांना उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जाहिरातदार आणि विक्रेता देखील झायगार्निक प्रभावचा वापर करतात. चित्रपट निर्माते, गंभीर तपशील सोडून लक्ष वेधण्यासाठी डिझाइन केलेले चित्रपटाचे ट्रेलर तयार करतात. ते दर्शकांचे लक्ष वेधून घेतात आणि  लोकांच्यामध्ये उत्सुकता वाढवतात. यांचे एक छान उदाहरण पाहू या...

व्ही शांताराम यांनी त्याकाळी पिंजरा चित्रपटाचे प्रमोशन हटके अंदाजात केलेले पाहायला मिळाले होते. वेळेची कमतरता आणि अपुरा पैसा ह्यामुळे चित्रपटाच्या जाहिराती करणे देखील कठीण होत होते. अश्यातच नवी युक्ती सुचली आणि इतिहास घडला. पुण्यातील रिक्षांवर कुठलाही फोटो न छापता केवळ ‘पिंजरा’ लिहूनच प्रमोशन केले होते. त्यामुळे हा पिंजरा नक्की आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला होता. अखेर ३१ मार्च १९७२ चा तो दिवस उजाडला आणि प्रेक्षकांनी पिंजरा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहाबाहेर तुडुंब गर्दी केलेली पाहायला मिळाली.

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम देखील या धोरणाचा वापर करतात. मालिकांचा भाग बर्‍याचदा उत्कंठा वाढवून संपवतात किंवा पुढील भागात नेमके काय होणार हे दाखविण्याचा प्रयत्न केलें जातो जेणेकरून उत्सुकता निर्माण करतात. असा सस्पेन्स आणि तणाव वाढवून तसेच काय होते हे जाणून घेण्यासाठी दर्शकांना पुढील भागासाठी ट्यून इन करण्यास प्रवृत्त केले जाते.

समारोप

झागार्निक प्रभाव सांगते की पूर्ण झालेल्या कामांपेक्षा अपूर्ण कामे लोकांच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. या सिद्धांताचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. व्यत्यय आलेले काम, अपूर्ण प्रकल्प आपले लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देण्याची त्यांची प्रवृत्ती असते. सतत उद्दिष्ट निश्चित केल्यामुळे आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या विचारांमुळे नकारात्मक परिणाम, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. तथापि, हे सिद्धी आणि सुधारित स्व-मूल्याची उत्तम भावना देखील देऊ शकते. एकूणच, झागार्निक परिणाम आपल्या वैयक्तिक मानसिक आरोग्यावर अवलंबून असतो. कोणतेही काम पूर्णत्त्वास नेत असताना थोडासा ताण अपेक्षित आहे पण त्याचे फलित उत्तमच असेल. तसे पाहिल्यास जीवनाचा प्रवास हा अपूर्णच असतो तो कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे अपूर्णतेकडून पूर्णत्त्वाकडे जाणारा हा प्रवास आनंदमयी होवो हीच प्रार्थना!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ

Nickerson, C. (2021). What Is the Zeigarnik Effect? Definition and Examples. Simply Psychology. retrieved from www.simplypsychology.org/zeigarnik-effect.html

Mazur, Elena (1996). The Zeigarnik Effect and the Concept of Unfinished Business in Gestalt Therapy, British Gestalt Journal, Vol.5/1, pp.18-23.

Savitsky, K., Medvec, V. H. and Gilovich, T., (1997) Remembering and Regretting: The Zeigarnik Effect and the Cognitive Availability of Regrettable Actions and Inactions, Personality and Social Psychology Bulletin, Vol.23/3, pp.248-257

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

 

21 व्या शतकातील कौशल्ये | SKILLS FOR 21st CENTURY

ए‍कविसावे शतक हे तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचे शतक आहे आणि येथे सर्व व्यक्ती एकमेकांशी जोडलेल्या असून सहकार्याने काम करणे अपेक्षित आहे. ए‍कविसाव्या शतकातील प्रत्येक विद्यार्थ्यास जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चिकित्सक विचार आणि सर्जनशील मानसिकता ही दोन मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांची अशी कोणतीही स्पष्ट व्याख्या नसली तरीही, ही काही ठराविक कौशल्ये आहेत जी या तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैश्विक वातावरणात जगण्यासाठी आवश्यक आहेत. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये ही अशी कौशल्ये आहेत जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतात जेणेकरून तो/ती आपल्या समाजाच्या/राष्ट्राच्या आणि जगाच्या प्रगती आणि विकासात योगदान देऊ शकेल.

प्रत्येकास यशस्वी होण्यासाठी ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. ए‍कविसाव्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच अनेक शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. ए‍कविसाव्या शतकात घडणार्‍या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षण पद्धती किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का हा कदाचित वादाचा मुद्दा असेलही पण आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शाळेतून शिकवली जातात का? हा विचार प्रवृत्त करणारा प्रश्न आहे. अशा कौशल्यांच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच ‘SKILLS FOR 21ST CENTURY‘.

आपणास एकाविशाव्या शतकातील कौशल्यांची गरज का आहे?

शिकणे तेव्हाच पूर्ण आणि सर्वांगीण होते जेव्हा एखादा विद्यार्थी स्वत:, शाळा, कुटुंब, समाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाप्रती असलेल्या त्याच्या/तिच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यास सक्षम असतो. आजच्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता ओळख आणि क्षमतांची चांगली जाणीव असणे तसेच एक चांगला नागरिक आणि एक जबाबदार माणूस बनण्यासाठी सक्षम करणे हे एकाविशाव्या शतकातील कौशल्यांचे ध्येय आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये ही लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित समस्या आणि समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम बनविते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात ए‍कविसाव्या शतकातील कौशल्यांचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेले आढळते. अध्ययन कौशल्ये (Learning Skills): नवीन ज्ञान संपादन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये. साक्षरता कौशल्ये (Literacy Skills): वाचन, माध्यम आणि डिजिटल संसाधनांद्वारे नवीन ज्ञान तयार करण्यात आणि प्राप्त करण्यात मदत करणारी कौशल्ये. जीवन कौशल्ये (Life Skills): दैनंदिन जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये.

अध्ययन कौशल्ये (शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी)

अध्ययन कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर कामाचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये. अध्ययन कौशल्ये ही खालील चार प्रकारात विभागलेली आहेत.

1. चिकित्सक विचार करणे (Critical Thinking)

चिकित्सक विचार म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे होय. चिकित्सक विचारामध्ये प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील राहणे, प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असणे, स्वतंत्र वैचारिक बैठक असणे, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य असणे आणि मूल्ये, समवयस्कांचा दबाव आणि मीडियांचा प्रभाव ओळखणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

2. संप्रेषण (Communication)

संप्रेषण म्हणजे एखाद्याची मते, इच्छा, गरजा, शंका इत्यादी योग्यरित्या, शा‍ब्दिक  आणि अशाब्दिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता होय. आज संप्रेषणाची माध्यमे बदलली असली तरीही आभासी संप्रेषण करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणे ही कौशल्ये प्रभावी संप्रेषणासाठी आवश्यक आहेत.

3. सर्जनशीलता आणि नवोपक्रमशीलता (Creativity and Innovation)

विचार करण्याचे नवीन मार्ग शोधणे आणि तयार करणे यांचा समावेश सर्जनशील कौशल्यात होतो. सर्जनशीलता म्हणजे गोष्टीकडे पाहण्याचा किंवा गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचा नवीन मार्ग शोधणे होय यामध्ये प्रवाहीपणा (नवीन कल्पना निर्माण करणे), लवचिकता (दृष्टीकोन सहज बदलणे), मौलिकता (मूलभूत कल्पनांचा आविष्कार), आणि विस्तार (इतरांच्या कल्पनांवर आधारित) यांचा समावेश होतो.

नाविन्यपूर्ण कौशल्ये म्हणजे काहीतरी नवीन/अद्वितीय/सुधारित/विशिष्ट पद्धतीने विकसित करण्यासाठी सर्जनशीलपणे विचार करण्याची कौशल्ये. नवनवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूंनी विचार करताना कोणत्याही विचाराशी चिकटून न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहजपणे विस्तार करता येणे इत्यादी कौशल्ये सर्जनशीलतेत येतात.

4. सहकार्य (Collaboration)

सहकार्य म्हणजे इतरांसोबत प्रभावीपणे काम करण्याची क्षमता तसेच इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता होय. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असतात त्यावेळी इतरांच्या मतांचा आदर ठेऊन, संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणे आवश्यक ठरते. सहकार्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रस आणि मनोरंजन विकसित होण्यास मदत होते. हे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय सीमा प्रभावीपणे विस्तृत करते आणि विद्यार्थ्यास सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.

साक्षरता कौशल्ये (माहिती-तंत्रज्ञान युगात यशस्वी होण्यासाठी)

साक्षरता या विभागात माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता, तंत्रज्ञान साक्षरता यांचा समावेश होतो. या कौशल्यांमध्ये माहिती (पारंपारिक किंवा डिजिटल), माध्यम आणि तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करण्याची क्षमता, सामग्री आणि माहितीचे विविध पैलू समजून घेणे, गंभीरपणे मूल्यांकन करणे, प्रभावीपणे तयार करणे आणि संप्रेषण करणे समाविष्ट आहे. पारंपरिक पद्धतीने माहिती असलेली साक्षरता महत्वाची आहेच पण त्याच बरोबरीने एकविसाव्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहेत. या साक्षरतेचे तीन  प्रकारात विभागणी केलेली आहे.

1. माहिती साक्षरता (Information Literacy)

सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे (उदाहरणार्थ– इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास/विश्लेषण करणे), माहितीचा योग्य आणि सर्जनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी.

2. माध्यम साक्षरता (Media Literacy)

एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणे, एखाद्या मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणे, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूंची माहिती असणे इत्यादीचा समावेश यात होतो.

3. तंत्रज्ञान साक्षरता (Technology Literacy)

तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठीची कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.

जीवन कौशल्ये (जीवनात यशस्वी होण्यासाठी)

नावाप्रमाणेच जीवन कौशल्ये म्हणजे वैयक्तिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये होत. बहुतांशी ही कौशल्ये वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात देखील होतो.

1. लवचिकता आणि अनुकूलता (Flexibility and Adaptability)

लवचिकता आणि अनुकूलता म्हणजे सतत आपल्या सभोवताल होणार्‍या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे आणि नवीन परिस्थितीनुसार त्याने उचललेली पावले आणि नैतिकता आणि मूल्यांशी तडजोड न करता कार्यक्षमतेने अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करणे होय.

नवीन वातावरणाला अनुकूल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल किंवा पुनर्रचना करणे म्हणजे  अनुकूलता होय. विद्यार्थ्यांसाठी, हे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी लवचिक आणि अनुकूल होण्यासाठी आवश्यक कौशल्ये समजू शकतात आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम संभाव्य उपाय शोधू शकतात.

2. नेतृत्व आणि जबाबदारी (Leadership and Responsibility)

नेतृत्व म्हणजे संघाचे नेतृत्व करणे तसेच वेगवेगळ्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आणि वास्तविक जगाच्या आव्हानांच्या संदर्भात प्रभावी संघ व्यवस्थापन करण्यास सक्षम असणे होय. या कौशल्यामुळे मुलाला चिकाटी, वचनबद्धता आणि जबाबदार असणे, लवचिकता आणि आत्मविश्वास यासारख्या मुख्य वैयक्तिक गुणांच्या विकासास कसे समर्थन द्यावे आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वचनबद्धता कशी वाढवावी हे शिकविते.

जबाबदार असणे म्हणजे एक चांगला आणि प्रभावी/संवेदनशील नागरिक असणे. एक माणूस म्हणून आणि विद्यार्थी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता, भविष्यात परिणाम करू शकणार्‍या महत्त्वाच्या सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांबद्दल जागरूकता. माणूस म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून, आपली मूलभूत कर्तव्ये आणि हक्कांची जाणीव असणे आणि भारतातील मूलभूत लोकशाही मूल्ये अंतर्भूत करणे आणि त्यांच्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

3. पुढाकार घेणे आणि स्व-दिशा (Initiative and self-direction)

पुढाकार कौशल्यामध्ये स्वतंत्रपणे कार्य सुरू करण्याची क्षमता समाविष्ट असते यामध्ये कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य आणि अंतःप्रेरणेतून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरु करण्याचे कौशल्य समाविष्ट आहेत. हे मुलाला स्वतःच्या विकासाचा मार्ग तयार करण्यास मदत करते. स्व-प्रेरणा आणि पुढाकार घेण्यावर प्रामाणिकपणे कार्य करणे हे स्व-दिशा कौशल्य आहे.

4. उत्पादकता आणि उत्तरदायित्व (Productivity and accountability)

ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले उत्पादक काम करता येणे तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य होय. विद्यार्थ्यामध्ये उत्पादकता विकसित करणे म्हणजे एका ठराविक कालावधीत कोणतेही कार्य पूर्ण करण्यास सक्षम बनविणे.

उत्तरदायित्व म्हणजे कोणत्याही कामासाठी जबाबदारीची भावना लक्षात येणे. विद्यार्थ्यामध्ये ही कौशल्ये विकसित केल्याने त्याला/तिला प्रभावीपणे काम करण्यास मदत होते आणि त्याच्या/तिच्या कृतींसाठी जबाबदार राहून तो/ती इतर समवयस्कांसाठी विश्वासार्ह बनवतो.

5. सामाजिक आणि आंतर-सांस्कृतिक संवाद (Social and cross cultural interaction)

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात संवाद साधण्याची, सहकार्याने आणि प्रभावीपणे काम करण्याची ही कौशल्ये आहेत. वेगवेगळ्या शहरांत, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतींमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्यासाठी ही कौशल्ये उपयोगी ठरतात.

समारोप:

सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना ही कौशल्ये आत्मसात करता येतातच असे नाही त्यामुळे इतर ठिकाणाहून ही कौशल्ये आत्मसात करून स्वत:चा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. सध्या येऊ घातलेले आणि आंमलात येत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) आपणास एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी अशा कौशल्यांची आवश्यकता अधोरेखित केलेले आढळते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या 21st Century Skills: A Handbook या पुस्तकात वयोगटानुसार आणि कौशल्यानुसार परिणाम कसा असावा हे उदाहरणासहित स्पष्ट केलेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ही कौशल्ये जर असतील तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यापासून आपणास कोणी थांबू शकणार नाही.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार )

संदर्भ:

CBSE (2020). 21st Century Skills: A Handbook, Delhi: Central Board of Secondary Education

Trilling, Bernie and Charles Fadel (2012). 21st Century Skills: Learning for Life in Our Times, New York: Jossey-Bass

जेंटल पालकत्व (Gentle Parenting): आधुनिक पालकत्व

  जेंटल पालकत्व ( Gentle Parenting): आधुनिक पालकत्व (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) आजच्या वेगवान , स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण य...