संवैधानिक
नैतिकता (Constitutional Morality): भारतीय लोकशाहीचा कणा
भारतीय
लोकशाही ही केवळ निवडणुका, सत्तांतर किंवा
संसदीय प्रक्रिया यांपुरती मर्यादित नाही; ती एका गहन नैतिक
आणि तात्त्विक पायावर उभी आहे. या पायाला “संवैधानिक नैतिकता” असे म्हणतात.
राज्यघटना ही केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती एक मूल्यनिष्ठ, परिवर्तनवादी
आणि मानवकेंद्रित करार आहे. तिच्या प्रस्तावनेत नमूद केलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे केवळ घोषवाक्ये
नसून भारतीय समाजव्यवस्थेच्या पुनर्रचनेचे दिशादर्शक तत्त्व आहेत. या मूल्यांप्रती
निष्ठा आणि त्यांचे व्यवहारात पालन करणे म्हणजेच संवैधानिक नैतिकता होय.
आधुनिक
काळात सोशल मीडियावरील द्वेषपूर्ण भाष्य, धार्मिक ध्रुवीकरण, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर
मर्यादा आणि संस्थात्मक स्वायत्ततेवरील प्रश्न या पार्श्वभूमीवर संवैधानिक
नैतिकतेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. लोकशाही टिकवायची असेल, तर संविधानातील मूल्ये व्यवहारात उतरवावी लागतील.
संवैधानिक नैतिकतेची संकल्पना
संवैधानिक नैतिकता ही संकल्पना
भारतीय लोकशाहीच्या मूल्याधिष्ठित चौकटीच्या केंद्रस्थानी आहे. तिचा मूलार्थ असा
की, राज्यघटनेतील तत्त्वे, मूल्ये, अधिकार आणि
आदर्श यांचे केवळ कायदेशीर पालन नव्हे तर नैतिक आणि तत्त्वनिष्ठ पालन करणे आवश्यक
आहे. म्हणजेच, शासनसंस्था, न्यायव्यवस्था
आणि नागरिक यांनी आपल्या कृतींमध्ये संविधानाच्या आत्म्याशी निष्ठा राखली पाहिजे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत (Preamble) नमूद केलेली
चार मूलभूत मूल्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि
बंधुता ही संवैधानिक नैतिकतेची आधारशिला आहेत. ही मूल्ये केवळ घोषवाक्य नसून
राज्यकारभाराच्या आणि नागरिकांच्या वर्तनाचे नैतिक दिशादर्शक तत्त्वे आहेत (Austin,
1966;
Seervai, 1996).
(1) न्याय (Justice)
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या त्रिसूत्रीचा उल्लेख आहे. सामाजिक न्याय
म्हणजे जात, लिंग, धर्म किंवा
वर्ग यांच्या आधारावर होणारा भेदभाव दूर करणे; आर्थिक न्याय
म्हणजे संसाधनांचे समतोल वितरण; तर राजकीय न्याय म्हणजे प्रत्येक
नागरिकाला शासन प्रक्रियेत समान सहभागाची संधी मिळणे. Supreme
Court of India ने Kesavananda Bharati v. State of
Kerala (1973) या ऐतिहासिक निर्णयात न्याय आणि समतेला संविधानाच्या “मूलभूत
रचने”चा भाग मानले आहे. यावरून न्याय ही केवळ धोरणात्मक कल्पना नसून संविधानाच्या
अस्तित्वाचा अविभाज्य घटक आहे (Sathe, 2002).
(2) स्वातंत्र्य (Liberty)
संविधानात विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि
उपासना यांचे स्वातंत्र्य मूलभूत अधिकार म्हणून संरक्षित आहे (कलम 19, 21, 25).
स्वातंत्र्य हे केवळ वैयक्तिक मोकळीक नसून मानवी प्रतिष्ठेचा पाया आहे. Maneka
Gandhi v. Union of India (1978) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने “जीवन
आणि वैयक्तिक स्वातंत्र्य” (Article 21) याची व्यापक व्याख्या करून त्यात
मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि नैसर्गिक न्याय या
घटकांचा समावेश केला. त्यानंतर Navtej Singh Johar v. Union of India
(2018)
या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की, संविधानातील
स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा या मूल्यांना सामाजिक नैतिकतेपेक्षा प्राधान्य आहे.
(3) समता (Equality)
समता ही संवैधानिक नैतिकतेचा गाभा
आहे. कलम 14 ते 18 पर्यंत समानतेचे तत्त्व स्पष्ट केले आहे. कायद्यापुढे सर्व समान
आहेत आणि कोणालाही अन्यायकारक भेदभाव केला जाणार नाही. डॉ. आंबेडकरांच्या मते, राजकीय लोकशाही
टिकण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आवश्यक आहे; अन्यथा “एक
व्यक्ती एक मत” ही संकल्पना अपुरी ठरेल (Ambedkar, 1949). Indra
Sawhney v. Union of India (1992) या प्रकरणात न्यायालयाने सामाजिक न्याय
आणि आरक्षण धोरण हे समतेच्या तत्त्वाशी सुसंगत असल्याचे स्पष्ट केले. म्हणजेच, समता म्हणजे
केवळ औपचारिक समानता नव्हे तर वास्तविक समानतेची हमी.
(4) बंधुता (Fraternity)
बंधुता म्हणजे सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि
व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे संरक्षण. प्रस्तावनेत “व्यक्तीची प्रतिष्ठा आणि
राष्ट्राची एकता व अखंडता” यासाठी बंधुतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
आंबेडकरांनी स्पष्ट केले की, समता आणि स्वातंत्र्य यांची
अंमलबजावणी बंधुतेशिवाय शक्य नाही. सामाजिक वैमनस्य, जातीय द्वेष
किंवा धार्मिक ध्रुवीकरण यामुळे संविधानातील मूल्ये कमकुवत होतात. S.
R. Bommai v. Union of India (1994) या प्रकरणात धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय
एकात्मता यांना संवैधानिक नैतिकतेचा भाग मानण्यात आले.
संवैधानिक नैतिकता म्हणजे
राज्यघटनेतील मूल्यांची अंतःकरणपूर्वक निष्ठा. ती केवळ न्यायालयीन संकल्पना नसून
नागरिकांच्या वर्तनात प्रतिबिंबित होणारी सामाजिक जबाबदारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि
बंधुता ही मूल्ये केवळ तत्त्वज्ञान नसून भारतीय लोकशाहीचे नैतिक अधिष्ठान आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने, संविधानाची यशस्वी अंमलबजावणी ही
कागदावरील तरतुदींवर नव्हे, तर समाजातील संवैधानिक नैतिकतेच्या
संस्कारांवर अवलंबून आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : संवैधानिक
नैतिकतेची संकल्पना
संवैधानिक नैतिकता ही संकल्पना
आधुनिक लोकशाही विचारांच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या संकल्पनेचा
उगम 19व्या शतकातील ग्रीक इतिहासकार व उदारमतवादी विचारवंत George
Grote यांच्या
लेखनातून झाला असे मानले जाते. त्यांनी आपल्या History of
Greece या ग्रंथात अथेन्सच्या लोकशाहीचे विश्लेषण करताना “constitutional
morality” ही संज्ञा वापरली. Grote यांच्या मते, कोणतीही
लोकशाही व्यवस्था केवळ संस्थात्मक चौकटीवर किंवा कायद्यांवर टिकत नाही; ती
नागरिकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या विशिष्ट नैतिक संस्कारांवर आधारित
असते. म्हणजेच, संविधानातील प्रक्रियांचा आदर, विरोधी मतांचा
स्वीकार, कायद्याचे राज्य (Rule of Law) आणि सार्वजनिक जबाबदारी यांचा
अंगीकार हा लोकशाही टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे (Grote, 1862).
Grote
यांच्या मते,
“constitutional morality” म्हणजे संविधानिक पद्धतींचा प्रामाणिक स्वीकार
आणि राजकीय सत्तेचा वापर करताना स्वनियंत्रण राखणे. त्यांनी स्पष्ट केले की, बहुमताला
सर्वकाही करण्याचा अधिकार नसतो; बहुमतानेही संविधानाच्या मर्यादा
पाळल्या पाहिजेत. हीच संकल्पना पुढे विविध लोकशाही राष्ट्रांमध्ये चर्चिली गेली
आणि भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
भारतीय संदर्भात या संकल्पनेला सखोल
आणि परिवर्तनवादी अर्थ दिला तो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ
आंबेडकर यांनी. संविधान सभेतील चर्चेदरम्यान (4 नोव्हेंबर 1948) त्यांनी
स्पष्ट शब्दांत सांगितले: “Constitutional morality is not a
natural sentiment. It has to be cultivated.”
डॉ. आंबेडकरांच्या या विधानाचा अर्थ
असा की, संविधानातील मूल्यांविषयी निष्ठा ही आपोआप निर्माण होत नाही; ती जाणीवपूर्वक
शिक्षण, सामाजिक संवाद आणि लोकशाही संस्कारांद्वारे विकसित करावी लागते (Constituent
Assembly Debates, Vol. VII, 1948). भारतीय समाजात शतकानुशतके चालत आलेल्या
जातिव्यवस्था, सामाजिक विषमता आणि धार्मिक रूढी यांमुळे
लोकशाही मूल्यांची स्वाभाविक जडणघडण झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी चेतावणी दिली
की, संविधान उत्तम असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर लोकशाही
मूल्यांप्रती प्रामाणिक नसतील, तर लोकशाही धोक्यात येऊ शकते.
डॉ. आंबेडकरांच्या मते, लोकशाही ही
केवळ शासनपद्धती नसून ती “जीवनपद्धती” (way of life) आहे. त्यांनी
“भक्ती किंवा नायकपूजा” (hero-worship) या प्रवृत्तीविरुद्ध इशारा दिला, कारण ती
लोकशाहीच्या तत्त्वांशी विसंगत आहे. त्यांच्या मते, व्यक्तीपेक्षा
संस्था आणि कायदे श्रेष्ठ असले पाहिजेत. जर नागरिकांनी संविधानातील मूल्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि
न्याय यांना प्राधान्य दिले नाही, तर राजकीय लोकशाही सामाजिक विषमतेत
अडकून पडेल. म्हणूनच त्यांनी राजकीय लोकशाहीबरोबर सामाजिक लोकशाहीची आवश्यकता
अधोरेखित केली (Ambedkar, 1949).
याच अनुषंगाने त्यांनी “संवैधानिक
नैतिकता” ही संकल्पना भारतीय समाजातील पारंपरिक सामाजिक नैतिकतेपेक्षा वरचढ
असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक नैतिकता अनेकदा रूढी, परंपरा आणि
बहुसंख्याकांच्या मतांवर आधारित असते; परंतु
संवैधानिक नैतिकता ही व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा, मूलभूत
हक्कांचा आणि कायद्याच्या अधिराज्याचा आदर करते. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी
संविधान स्वीकारताना लोकांना आवाहन केले की, त्यांनी केवळ
संविधानाचा सन्मान करू नये, तर त्यामागील मूल्यांचे पालन करावे.
अशा प्रकारे,
George Grote यांच्या ऐतिहासिक आणि तात्त्विक मांडणीपासून सुरू झालेली “constitutional
morality” ही संकल्पना डॉ. आंबेडकरांनी भारतीय संदर्भात सामाजिक न्याय, समता आणि
परिवर्तनाच्या साधनरूपात पुनर्मांडणी केली. भारतीय लोकशाहीचे यश हे केवळ लिखित
राज्यघटनेवर नव्हे, तर त्या राज्यघटनेतील मूल्यांना
जपणाऱ्या नागरिकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नैतिक बांधिलकीवर अवलंबून आहे हीच या
ऐतिहासिक पार्श्वभूमीची मध्यवर्ती शिकवण आहे.
संवैधानिक नैतिकता विरुद्ध सामाजिक
नैतिकता
भारतीय समाज बहुविध परंपरा, धर्म, जात, भाषा आणि
सांस्कृतिक रूढींनी समृद्ध आहे; परंतु या परंपरांपैकी काही रूढी आणि
सामाजिक मान्यता राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांशी विसंगत ठरतात. येथेच सामाजिक
नैतिकता आणि संवैधानिक नैतिकता यांच्यातील
संघर्ष प्रकर्षाने दिसून येतो. सामाजिक नैतिकता म्हणजे एखाद्या समाजात
ऐतिहासिकदृष्ट्या रूढ झालेली, बहुसंख्याकांनी स्वीकारलेली
आचारसंहिता; तर संवैधानिक नैतिकता म्हणजे राज्यघटनेतील
मूल्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता
आणि व्यक्तीची प्रतिष्ठा यांना सर्वोच्च मानून आचरण करणे.
डॉ. आंबेडकर
यांनी संविधान
सभेत स्पष्टपणे नमूद केले होते की, "संवैधानिक
नैतिकता ही नैसर्गिक भावना नसून ती विकसित करावी लागते.". त्यांच्या मते, भारतासारख्या
परंपरानिष्ठ समाजात लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक रूढींपेक्षा संविधानातील
मूल्यांना प्राधान्य द्यावे लागेल.
अ. सामाजिक परंपरा व संविधानातील विसंगती
भारतात अनेक सामाजिक प्रथा या
संविधानातील कलम 14 (समतेचा अधिकार), कलम 15
(भेदभावास मनाई), कलम 19 (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि
कलम 21 (जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार) यांच्याशी विसंगत ठरतात.
(1) जातीय भेदभाव:
भारतीय समाजातील जातव्यवस्था ही
ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक नैतिकतेचा भाग मानली गेली; परंतु ती
व्यक्तीच्या समतेच्या आणि प्रतिष्ठेच्या तत्त्वांना विरोध करते. संविधानातील कलम
17 ने अस्पृश्यतेचा स्पष्टपणे निषेध केला आहे. यावरून स्पष्ट होते की, सामाजिक
परंपरेपेक्षा संवैधानिक मूल्ये श्रेष्ठ मानली गेली.
(2) लिंगभेद:
स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या
अनेक प्रथा जसे की तिहेरी तलाक, स्त्रियांच्या मंदिरप्रवेशावरील बंदी
या सामाजिक नैतिकतेवर आधारित होत्या. परंतु Supreme Court
of India ने Shayara Bano v. Union of India (2017) आणि Indian
Young Lawyers Association v. State of Kerala (2018) (सबरिमला प्रकरण) यांमध्ये
स्पष्ट केले की, लिंगसमतेचे संवैधानिक मूल्य कोणत्याही धार्मिक
किंवा सामाजिक परंपरेपेक्षा श्रेष्ठ आहे.
(3) धार्मिक असहिष्णुता:
धर्माच्या नावाखाली
व्यक्तीस्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न हा सामाजिक नैतिकतेच्या चौकटीत
योग्य मानला जाऊ शकतो; परंतु संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांशी तो विसंगत ठरतो. S.R.
Bommai v. Union of India (1994) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने
धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूलभूत रचना असल्याचे स्पष्ट केले.
ब. Navtej
Singh Johar प्रकरण: संवैधानिक नैतिकतेचा विजय
Navtej
Singh Johar v. Union of India या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने
भारतीय दंड संहितेतील कलम 377 (Section 377, IPC) अंतर्गत
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारी तरतूद घटनाबाह्य घोषित केली (2018). या
निर्णयात न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, “Constitutional
morality must prevail over social morality.”
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी
आपल्या निर्णयात व्यक्तीची प्रतिष्ठा, गोपनीयता (Privacy - Justice K.S. Puttaswamy v. Union of India, 2017) आणि
वैयक्तिक स्वायत्तता या मूल्यांचा आधार घेतला. त्यांनी
नमूद केले की, बहुसंख्याकांच्या नैतिकतेवर आधारित सामाजिक
मतप्रवाह हा अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणू शकत नाही.
या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले
की, संविधानातील मूल्ये ही परिवर्तनवादी (transformative)
आहेत. म्हणजेच, संविधान केवळ
विद्यमान सामाजिक संरचना जपण्यासाठी नसून, अन्यायकारक
परंपरा बदलण्यासाठी आहे.
क. संवैधानिक नैतिकतेचे तात्त्विक महत्त्व
संवैधानिक नैतिकता ही परिवर्तनवादी
राज्यघटना या संकल्पनेशी निगडित आहे. भारतीय
राज्यघटना सामाजिक क्रांतीचे साधन आहे हे डॉ. आंबेडकरांचे स्पष्ट मत होते. सामाजिक
नैतिकता अनेकदा बहुसंख्याकांच्या भावनांवर आधारलेली असते; परंतु
संवैधानिक नैतिकता व्यक्तीच्या प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवते. यामुळेच, लोकशाही केवळ “majoritarian
rule” नसून
“constitutional rule” ठरते. म्हणजेच, बहुमताच्या
इच्छेलाही संविधानाच्या मर्यादा पाळाव्या लागतात.
भारतातील सामाजिक विविधता लक्षात
घेता सामाजिक नैतिकता अनेकदा संविधानातील मूल्यांशी संघर्ष करते. अशा वेळी
संवैधानिक नैतिकता ही मार्गदर्शक ठरते. जातीय भेदभाव, लिंगभेद, धार्मिक
असहिष्णुता यांसारख्या रूढींना आव्हान देऊन भारतीय न्यायव्यवस्थेने संविधानातील
समता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे तत्त्व अधोरेखित केले आहे. Navtej
Singh Johar प्रकरण हा त्याचा सर्वोत्तम आदर्श आहे जिथे न्यायालयाने स्पष्ट केले
की, व्यक्तीच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी संवैधानिक नैतिकता ही
सामाजिक नैतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे.
संवैधानिक नैतिकतेची आवश्यकता
(1) लोकशाहीचे संरक्षण
लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती
मर्यादित नसून ती संविधानिक मर्यादा, सत्ताविभाजन
आणि कायद्याच्या राज्यावर (Rule of Law) आधारित असते. भारतीय राज्यघटना
सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधिमंडळ, कार्यपालिका
आणि न्यायपालिका या तीन प्रमुख यंत्रणा उभी करते. या त्रिसूत्री सत्ताविभाजनामुळे
कोणत्याही एका संस्थेकडे अमर्याद सत्ता जमा होत नाही. याच संदर्भात डॉ आंबेडकर यांनी संविधान सभेत स्पष्ट केले होते की, लोकशाही
टिकवण्यासाठी संविधानिक पद्धतींचे पालन आवश्यक आहे; अन्यथा राजकीय
अराजकता निर्माण होऊ शकते.
भारतीय सर्वोच्च न्यायालयामार्फत Kesavananda
Bharati v. State of Kerala (1973) या ऐतिहासिक प्रकरणात ‘मूलभूत रचना
सिद्धांत’ मांडला. या निर्णयानुसार संसदेला
संविधान दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी ती संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का
देऊ शकत नाही. हा निर्णय संवैधानिक नैतिकतेचा सर्वोच्च नमुना मानला जातो, कारण त्यातून
लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्यायालयीन पुनरावलोकन आणि मूलभूत
हक्क यांचे संरक्षण झाले (Austin, 1999). यावरून स्पष्ट होते की, संवैधानिक
नैतिकता ही लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक संरक्षक कवच आहे. ती सत्ताधाऱ्यांना
मर्यादा घालते आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते.
(2) अल्पसंख्याकांचे रक्षण
लोकशाहीत बहुमताचा निर्णय महत्त्वाचा
असला तरी तो संविधानाच्या मूल्यांपेक्षा वरचढ नसतो. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क
(Part III) आणि राज्याच्या धोरणनिर्देशक तत्वांद्वारे (Part
IV) अल्पसंख्याकांचे
संरक्षण सुनिश्चित केले आहे. Navtej Singh Johar v. Union of India
(2018)
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेवरील भारतीय दंडसंहितेचे कलम 377 रद्द
करताना स्पष्ट केले की “संवैधानिक नैतिकता ही सामाजिक नैतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे.”
न्यायालयाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला आणि
स्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान दिले.
तसेच S.R. Bommai v.
Union of India (1994) प्रकरणात धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूलभूत रचना असल्याचे
घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे धार्मिक बहुसंख्याकतेच्या आधारे राज्यकारभार
चालविण्याला मर्यादा घालण्यात आल्या.
डॉ. आंबेडकर यांनी वारंवार सांगितले
होते की भारतात राजकीय लोकशाही टिकण्यासाठी सामाजिक लोकशाही आवश्यक आहे. सामाजिक
लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा एकत्रित
अनुभव. ही मूल्ये केवळ बहुसंख्याकांसाठी नसून सर्वांसाठी आहेत (Ambedkar,
Annihilation of Caste, 1936). म्हणूनच संवैधानिक नैतिकता ही
अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करणारी एक मूलभूत यंत्रणा आहे.
(3) सामाजिक परिवर्तन
भारतीय राज्यघटना ही केवळ प्रशासकीय
दस्तऐवज नसून ती सामाजिक परिवर्तनाचा आराखडा आहे. Granville
Austin यांनी भारतीय राज्यघटनेला “a social
revolution in law” असे संबोधले आहे (Austin, The Indian Constitution:
Cornerstone of a Nation, 1966).
डॉ. आंबेडकरांच्या मते, राज्यघटना ही
सामाजिक क्रांतीचे माध्यम आहे. त्यांनी संविधान सभेत म्हटले होते की, भारतात राजकीय
लोकशाही आणली असली तरी सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर केली नाही तर ही लोकशाही
धोक्यात येईल (Constituent Assembly Debates, 25
November 1949). उदा. अस्पृश्यता प्रतिबंध (Article 17), समान
संधीचा हक्क (Article 16) आणि शिक्षणाचा हक्क (Article
21A) या तरतुदी केवळ कायदेशीर उपाय नसून सामाजिक परिवर्तनाची साधने आहेत.
Shayara
Bano v. Union of India (2017) या प्रकरणात ‘तिहेरी तलाक’ प्रथा
असंवैधानिक ठरवून न्यायालयाने स्त्री-पुरुष समानतेला बळकटी दिली. हा निर्णय
सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. संवैधानिक नैतिकतेमुळे राज्यघटना समाजातील
अन्याय, भेदभाव आणि विषमता यांना आव्हान देते आणि समानतेवर आधारित
समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करते. संवैधानिक नैतिकतेची आवश्यकता तीन
स्तरांवर अधोरेखित होते:
- लोकशाहीच्या संस्थांचे संरक्षण
- अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांचे रक्षण
- सामाजिक क्रांती आणि परिवर्तनाला गती देणे
भारतीय राज्यघटना ही केवळ
शासनप्रणालीची चौकट नसून ती एक नैतिक दृष्टीकोन आहे. डॉ. आंबेडकरांनी
सांगितल्याप्रमाणे, संवैधानिक नैतिकता जोपासली गेली तरच
लोकशाही दीर्घकाळ टिकू शकते.
आधुनिक काळातील आव्हाने आणि
संवैधानिक नैतिकतेची अपरिहार्यता
भारतीय लोकशाही आज ज्या संक्रमणाच्या
टप्प्यावर उभी आहे, त्या पार्श्वभूमीवर संवैधानिक
नैतिकता ही केवळ सैद्धांतिक संकल्पना राहिलेली नाही; ती लोकशाहीच्या
अस्तित्वाशी निगडित असलेली व्यावहारिक आवश्यकता बनली आहे. राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि
बंधुता ही मूल्ये आधुनिक काळातील विविध आव्हानांमुळे सतत परीक्षेला सामोरी जात
आहेत. खालील चार प्रमुख क्षेत्रांमध्ये ही आव्हाने प्रकर्षाने जाणवतात.
(1) धर्माधारित राजकारण
भारतीय राज्यघटना भारताला
“धर्मनिरपेक्ष” राष्ट्र म्हणून परिभाषित करते.
धर्मनिरपेक्षता ही केवळ राज्याची तटस्थ भूमिका नसून सर्व धर्मांना समान सन्मान
देण्याची सकारात्मक भूमिका आहे. डॉ आंबेडकर यांनी
राज्यघटना ही सामाजिक लोकशाहीची हमी देणारी असावी, असे स्पष्ट
केले होते.
तथापि, आधुनिक
राजकारणात धर्माचा वापर मतदारसंघांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केला जातो. धार्मिक
ओळखीवर आधारित प्रचार, बहुसंख्याकवाद आणि
अल्पसंख्याकांविषयी संशय निर्माण करणे या प्रवृत्ती संवैधानिक नैतिकतेला बाधा
पोहोचवतात. त्यामुळे धर्माधारित सत्तेचा वापर
संविधानविरोधी ठरतो.
संवैधानिक नैतिकतेच्या दृष्टीने, धर्म हा
वैयक्तिक श्रद्धेचा विषय असला तरी राज्यकारभारात समानता आणि तटस्थता आवश्यक आहे.
धर्माधारित राजकारण संविधानातील समतेच्या (Article 14) आणि
धर्मस्वातंत्र्याच्या (Article 25) तत्त्वांना बाधा आणू शकते.
(2) अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19(1)(a) नागरिकांना
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करतो. हा अधिकार लोकशाहीचा प्राण आहे.
परंतु आधुनिक काळात अभिव्यक्तीवर विविध प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत जसे की
देशद्रोह कायद्याचा वापर, इंटरनेट बंदी, पत्रकारांवरील
कारवाई इत्यादी.
Supreme
Court of India ने Shreya Singhal vs Union of India (2015) या
प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66A रद्द केले आणि
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण केले. न्यायालयाने स्पष्ट केले की अस्पष्ट आणि
दडपशाही करणारे कायदे संविधानविरोधी आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिरेकी
निर्बंध घालणे म्हणजे संवैधानिक नैतिकतेच्या मूलभूत आत्म्यालाच बाधा पोहोचवणे होय.
लोकशाहीमध्ये असहमती (Dissent) ही देशद्रोह नसून ती प्रगतीची प्रेरक
शक्ती असते.
(3) न्यायव्यवस्थेवरील दबाव
संवैधानिक नैतिकतेचा सर्वात मोठा
रक्षक म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारतीय न्यायव्यवस्था कार्यपालिका आणि
विधिमंडळावर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची संस्था आहे. परंतु नियुक्त्या, बदली, राजकीय टीका
आणि न्यायालयीन निर्णयांवर सार्वजनिक दबाव यांमुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता
आव्हानासमोर उभी राहते.
Kesavananda
Bharati vs State of Kerala (1973) या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च
न्यायालयाने “मूलभूत रचना सिद्धांत” मांडला, ज्यामुळे
संसदेला अमर्यादित दुरुस्ती करण्यापासून रोखण्यात आले. हा निर्णय संवैधानिक
नैतिकतेचा सर्वोच्च नमुना मानला जातो. न्यायव्यवस्थेवरील दबाव वाढल्यास
संविधानातील संतुलन ढासळू शकते. त्यामुळे न्यायपालिकेची
स्वायत्तता ही संवैधानिक नैतिकतेची अनिवार्य अट आहे.
(4) सामाजिक माध्यमांवरील द्वेषपूर्ण भाष्य
डिजिटल युगात सामाजिक माध्यमे ही
संवादाची प्रमुख साधने बनली आहेत. परंतु त्याच माध्यमांद्वारे द्वेषपूर्ण भाष्य, चुकीची माहिती
आणि धार्मिक/जातीय द्वेष पसरवला जातो. द्वेषपूर्ण भाष्यामुळे समाजात ध्रुवीकरण
वाढते आणि संविधानातील बंधुता (Fraternity) व व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे तत्त्व धोक्यात येते.
Pravasi
Bhalai Sangathan vs Union of India (2014) या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने
द्वेषपूर्ण भाष्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली, परंतु
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल राखण्यावर भर दिला. संवैधानिक
नैतिकतेच्या चौकटीत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर
करताना इतरांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे आवश्यक आहे. अन्यथा स्वातंत्र्य हे
अराजकतेत परिवर्तित होऊ शकते.
धर्माधारित राजकारण, अभिव्यक्ती
स्वातंत्र्यावर निर्बंध, न्यायव्यवस्थेवरील दबाव आणि सामाजिक
माध्यमांवरील द्वेषपूर्ण भाष्य ही सर्व आव्हाने भारतीय लोकशाहीच्या मूलभूत
तत्त्वांना सतत आव्हान देत आहेत. अशा परिस्थितीत संवैधानिक नैतिकता ही केवळ
कायदेशीर संकल्पना नसून ती एक नैतिक बांधिलकी आहे. ती नागरिक, राजकीय नेतृत्व
आणि संस्थांना संविधानातील मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची सतत आठवण करून देते. लोकशाही
टिकवण्यासाठी कायदे पुरेसे नसतात; त्यासाठी मूल्यनिष्ठ आचरण आवश्यक
असते. आणि तेच आचरण म्हणजे संवैधानिक नैतिकता.
नागरिकांची भूमिका: संवैधानिक
नैतिकतेचे जतन आणि संवर्धन
संवैधानिक नैतिकता ही केवळ
राज्यकर्ते, संसद किंवा न्यायव्यवस्था यांच्यापुरती मर्यादित
संकल्पना नाही; ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन वर्तनाशी
निगडित आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ आंबेडकर यांनी
स्पष्टपणे सांगितले होते की संविधान कितीही चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी
करणारे लोक जर चांगले नसतील तर ते अपयशी ठरेल. त्यामुळे संवैधानिक नैतिकता ही
नागरिकांच्या जाणीवपूर्वक आचरणातूनच साकार होते. भारतीय राज्यघटनेतील कलम 51A मध्ये नमूद
केलेली मूलभूत कर्तव्ये ही या नैतिकतेचे व्यवहार्य रूप आहे.
1) कायद्याचे पालन: लोकशाहीचा पाया
कायद्याचे पालन करणे म्हणजे केवळ
दंडाची भीती म्हणून नियम पाळणे नव्हे; तर संविधानाने
घालून दिलेल्या मूल्यांना स्वेच्छेने स्वीकारणे होय. Rule
of Law ही संकल्पना सांगते की कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. याच तत्त्वाला
बळकटी देताना Supreme Court of India ने Kesavananda
Bharati v. State of Kerala (1973) या प्रकरणात संविधानाची मूलभूत रचना अबाधित असल्याचे अधोरेखित केले.
नागरिकांनी कर भरणे, सार्वजनिक
संपत्तीचे रक्षण करणे, न्यायालयीन निर्णयांचा आदर करणे आणि
शांततेने आंदोलन करणे ही सर्व कृती संवैधानिक नैतिकतेचे भाग आहेत. जर नागरिकच
कायद्याचे उल्लंघन करू लागले, तर लोकशाहीची पायाभरणीच कमकुवत होते.
त्यामुळे कायद्याचे पालन ही केवळ कायदेशीर नव्हे तर नैतिक जबाबदारी आहे (Austin,
1966;
Granville, 1999).
2) विविधतेचा आदर: बंधुतेची जपणूक
भारतीय समाज बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय आणि
बहुसांस्कृतिक आहे. संविधानाच्या प्रस्तावनेतील “बंधुता” (Fraternity)
हा शब्द केवळ
भावनिक ऐक्य नव्हे, तर सामाजिक आदर आणि सहअस्तित्वाचे
तत्त्व दर्शवतो. धर्मनिरपेक्षतेचा पाया मजबूत करताना S.R.
Bommai v. Union of India (1994) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट
केले की भारताची राज्यरचना धर्मनिरपेक्ष आहे आणि राज्य कोणत्याही धर्माचे पक्षपाती
होऊ शकत नाही.
नागरिकांनी आपल्या श्रद्धा, भाषा किंवा
संस्कृती इतरांवर लादू नयेत; उलट विविधतेला स्वीकारणे, संवाद साधणे
आणि सहिष्णुता राखणे आवश्यक आहे. सामाजिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर
विविधतेचा आदर सामाजिक ऐक्य वाढवतो आणि सामूहिक ओळख सुदृढ करतो (Tajfel
& Turner, 1979). त्यामुळे संवैधानिक नैतिकतेचा आत्मा टिकवण्यासाठी नागरिकांची
बहुविधतेबद्दल सकारात्मक भूमिका अनिवार्य आहे.
3) भेदभावाला विरोध: समतेचे संरक्षण
संविधानातील कलम 14 ते 18 समतेचा
अधिकार प्रदान करतात. जात, धर्म, लिंग, भाषा किंवा वंश
यांच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी आहे. Navtej Singh
Johar v. Union of India (2018) या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च
न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम 377 रद्द करताना “संवैधानिक नैतिकता
सामाजिक नैतिकतेपेक्षा श्रेष्ठ आहे” असे स्पष्ट केले.
नागरिकांनी केवळ स्वतः भेदभाव टाळणे
पुरेसे नाही; तर अन्याय होत असल्यास त्याविरुद्ध आवाज उठवणेही
आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जातीय अत्याचार, लिंगभेद किंवा
धार्मिक द्वेष याविरोधात उभे राहणे हीच खरी संवैधानिक बांधिलकी आहे. डॉ.
आंबेडकरांच्या मते, सामाजिक लोकशाही ही राजकीय लोकशाहीइतकीच महत्त्वाची आहे. सामाजिक समता नसताना राजकीय
स्वातंत्र्य अपूर्ण राहते (Ambedkar, Constituent Assembly
Debates, 1949).
4) लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग: जबाबदार
नागरिकत्व
संवैधानिक नैतिकता जपण्यासाठी
नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. मतदान करणे, सार्वजनिक
चर्चांमध्ये सहभागी होणे, धोरणांवर टीका करणे, शांततामय
आंदोलने करणे ही सर्व कृती लोकशाही बळकट करतात.
भारतीय संविधान नागरिकांना
अभिव्यक्ती स्वातंत्र्य (कलम 19), संघटन स्वातंत्र्य आणि शांततामय
आंदोलनाचा अधिकार प्रदान करते. परंतु या अधिकारांसोबत जबाबदारीही जोडलेली आहे.
माहितीपूर्ण मतदान (Informed Voting) आणि तथ्याधारित
चर्चा या लोकशाहीच्या गुणवत्तेला उंचावतात (Dahl, 1989).
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर
जबाबदारीने वागणे, फेक न्यूज टाळणे आणि द्वेषपूर्ण
भाष्याला विरोध करणे हीसुद्धा संवैधानिक नैतिकतेची आधुनिक अभिव्यक्ती आहे.
समारोप:
संवैधानिक नैतिकता ही भारतीय
लोकशाहीचा आत्मा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेली ही संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची
आहे. सामाजिक परंपरा, राजकीय स्वार्थ किंवा बहुसंख्याकांची
इच्छा यांपेक्षा संविधानातील मूल्ये सर्वोच्च आहेत, ही जाणीवच खऱ्या अर्थाने
लोकशाही मजबूत करते. भारतीय राज्यघटना केवळ एक दस्तऐवज
नसून ती नागरिक आणि राज्य यांच्यातील एक नैतिक करार (Moral
Compact) आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा आजही तितकाच लागू आहे लोकशाही
टिकवायची असेल तर तिच्या मूल्यांचे पालन नागरिकांनीच करावे लागेल.
संदर्भ:
Ambedkar, B. R. (1936). Annihilation of Caste. Navayana Publishing
Ambedkar, B. R. (1948). Constituent Assembly Debates, 4
November 1948.
Ambedkar, B. R. (1949). Speech on the adoption of the Constitution, 25 November 1949.
Austin, G. (1966). The Indian Constitution: Cornerstone of a Nation. Oxford
University Press.
Austin, G. (1999). Working a Democratic Constitution: The Indian Experience.
Oxford University Press.
Baxi, U. (2008). The Future of Human Rights. Oxford University Press.
Bommai, S.R. vs
Union of India, (1994) 3 SCC 1.
Dahl, R. (1989). Democracy and Its Critics. Yale university press
Grote, G. (1862). History of Greece. London: John Murray.
Mehta, P. B. (2013). The Burden of Democracy. Penguin.
Sathe, S.P. (2002). Judicial Activism in India. Oxford University Press.
Seervai, H. M. (1996). Constitutional Law of India. N.M. Tripathi.
Tajfel, H., &
Turner, J. C. (1979). An integrative theory of intergroup conflict. In W. G.
Austin, & S. Worchel (Eds.), The social psychology of intergroup relations
(pp. 33-37). Monterey, CA: Brooks

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions